निर्भयपणाने करू मतदान…पोवाड्याच्या माध्यमातून जिंतूरमध्ये जनजागृती
जिंतूर/परभणी : जिंतूर मतदार संघातील सावंगी म्हाळसा, संक्राळा, अंबरवाडी या भागामध्ये स्वीप पथकाद्वारे शुक्रवारी, २५ ऑक्टोबररोजी मतदार जनजागृती करण्यात आली. यामध्ये ऐका ऐका मतदारांनो…माय बापांनो, निर्भयपणाने करू मतदान….आमची प्रगती आम्ही करू, मतदानाने देश घडवू…. या पोवाड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
भारतीय निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हास्तरीय स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी , तहसीलदार जिंतूर तथानजिंतूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश सरवदे, तहसीलदार सेलू तथा जिंतूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ शिवाजी मगर , नायब तहसीलदार निवडणूक सुग्रीव मुंडे यांच्या नियोजनानुसार मतदार जनजागृती कार्यक्रम सुरू आहे. लोकशाही बळकट आणि सक्षम करण्यासाठी निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत मतदारांचा जागरूकतेने उत्स्फूर्त मोठ्या सहभागाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक निवडणुकीत सर्व मतदारांनी जागरूकतेने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. जागरूक मतदार लोकशाही बळकट करतात. सक्षम लोकशाहीमध्ये मतदानाची टक्केवारी प्रचंड मोठी असते. मतदानाचा दिवस उत्सवासारखा साजरा केला जातो. तरुण मतदारांनी जागरूकतेने, जबाबदारीने आणि सजगतेने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. यासोबत तरुणांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या संपर्कातील प्रत्येक मतदाराचे प्रबोधन तरुण मतदान करण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. मतदानाबाबतची निरसता, नैराश्य दूर केले पाहिजे. मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस असे न समजता आपली सर्व कामे सांभाळून मतदानाच्या दिवशी प्राधान्याने मतदान केले पाहिजे. २ नोव्हेंबररोजी सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे अशा प्रकारचे प्रबोधन तालुकास्तरीय मतदार जनजागृती व सहभाग कार्यक्रमाचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले स्वीप सदस्य राजेंद्र ढाकणे यांनी केले. स्वीप पथकातील सदस्य आणि साहित्यिक मयूर जोशी खालील आशयगर्भ पोवाड्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. सावंगी म्हा, संक्राळा, अंबरवाडी या भागामध्ये चुनाव पाठशाळा, चौका-चौकात लोकशाही गप्पा, पथनाट्य याद्वारे स्वीप पथकाने मतदार जनजागृती केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रकाश चव्हाण, लक्ष्मीकांत नाईक, तुकाराम राठोड, वसंतराव इंगोले, जाधव, आव्हाड, राठोड यांच्यासह, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, सर्व शिक्षक यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात नवमतदार, महिला मतदार, दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिक मतदार, आणि सर्वच मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले.