जिंतूर-सेलूमध्ये रंगणार अटीतटीचा सामना
बोर्डीकर, भांबळे, नागरे यांची जोरदार मोर्चेबांधणी; जरांगे यांच्या उमेदवाराचीही उत्सुकता
सेलू/परभणी : परभणी जिल्ह्यातील जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघाच्या २०२४ च्या निवडणुकीत महायुतीकडून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार विद्यमान आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार विजय भांबळे, कॉंग्रेसचे बंडखोर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे मतदारसंघात अटीतटीचा सामना रंगणार असल्याचे चित्र सध्यातरी स्पष्ट झाले आहे.
अतिशय संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिंतूर विधानसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांना १३ हजार मतांची आघाडी येथे मिळालेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार विजय भांबळे यांनी उमेदवारी निश्चित समजूनच, गेल्या चार-पाच महिन्यांपासून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. प्रचाराची एक फेरी त्यांनी पूर्ण केल्याचा दावा केला जात आहे. बेरजेचे राजकारण करीत भांबळे यांनी अनेकांना आपल्या गळाला लावून संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. याचे मतांमध्ये रूपांतर करून विजयाचा मार्ग सुकर करण्यात भांबळे यांचे समर्थक किती यशस्वी ठरतात, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी संपूर्ण मतदारसंघात रेकार्डब्रेक विकास केल्याचा दावा करीत जबरदस्त फिल्डिंग लावलेली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’चे विजय भांबळे यांचा पराभव करून, बोर्डीकर जिंतूर-सेलूच्या पहिल्या महिला आमदार ठरलेल्या आहेत. भाजपने त्यांना पुन्हा मैदानात उतरविले आहे. बोर्डीकर यांनीही अनेकांना पक्ष प्रवेश देत, तगडी मोर्चेबांधणी केलेली आहे. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा राजकीय करिष्मा, रस्त्यांसह विविध विकास कामे आणि महायुती सरकारच्या विविध सरकारी योजना यांचा बोर्डीकर यांना पुन्हा विजय मिळवून देण्यासाठी कितपत फायदा होतो, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
कॉंग्रेसचे प्रदेश सचिव सुरेश नागरे यांनी पक्षाकडून उमेदवारी निश्चित असल्याचा दावा करीत, गेल्या दोन महिन्यांपासून जिंतूर, सेलू तालुक्यात संघटन मजबूत करण्यावर भर दिला. समाजातील विविध घटकांना जोडीत मोर्चेबांधणी सुरू केली. मात्र, महाविकास आघाडीकडून भांबळे यांना उमेदवारी जाहीर होताच, नागरे यांनी बंडखोरी करीत, वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी पदरात पाडून घेत, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि इरादा कायम ठेवलेला आहे. विजयाच्या गणिताची जुळवाजुळव त्यांनीही सुरू केलेली आहे. एकंदरीतच अपक्षांची होऊ पाहणारी भाऊ गर्दी रोखण्यात प्रमुख पक्षांचे उमेदवार कितीपत यशस्वी ठरतात, हे उमेदवारी अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होईल. दरम्यान, सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी, संवाद दौऱ्यासह सोशल मीडियावरून प्रचाराची रणधुमाळी उडवून दिलेली आहे.
♦जरांगे यांच्या उमेदवाराचीही उत्सुकता : जिंतूर, सेलू तालुक्यात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचाही मोठा प्रभाव आहे. त्यामुळे जरांगे यांच्याकडे उमेदवारीसाठी जिंतूर, सेलू तालुक्यातील इच्छुकांनी गर्दी केली. मात्र,अंतिम टप्प्यात तीन इच्छुक शिल्लक असून, त्यांना अपक्ष उमेदवारी दाखल करण्यास सांगितलेले आहे, अशी चर्चा आहे. मात्र, रिंगणातील उमेदवार कोण ? हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे जरांगे यांच्या उमेदवाराचीही उत्सुकता सर्वांनाच आहे. जरांगे यांचा उमेदवार रिंगणात उतरला, तर लढत अधिक रंगतदार ठरण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.