मराठ्यांच्या पाठिंब्याशिवाय सत्ता नाही : मनोज जरांगे पाटील
उमेदवार ठरणार ३० ऑक्टोबरला ?
प्रतिनिधी, जालना : ‘मराठा समाजाच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्रात कुणीच सत्तेवर येऊ शकत नाहीत. सध्या सगळेच राजकीय पक्ष आणि नेते रोज अंतरवाली सराटीत येऊन मराठा समाजाच्या पायावर डोके ठेवत आहेत. हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे, ही बाब आता तरी लक्षात घ्या, नाही तर सुपडा साफ होणार,’ असे वक्तव्य मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत केले.
‘विधानसभेवर कुणाला पाठवायचे, या संदर्भात मराठा समाजाच्या हिताचाच निर्णय असेल. तो आपण वेळेवर घेणार आहोत. आता येत्या तीस तारखेपर्यंत कुणीच अंतरवाली सराटीत येऊ नये,’ असे जरांगे-पाटील यांनी सांगितले. ‘जरांगे-पाटील आमचे जुने मित्र आहेत. अंतरवाली सराटीत गोळीबार झाल्यापासून आपण नेहमीच त्यांना भेटायला येतो. भेटण्यात काय वावगे ठरणार ?’ असे आमदार संजय शिरसाट म्हणाले. ‘जरांगे-पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. चर्चा काय झाली ते गुप्त आहे. सार्वजनिक सांगता येत नाही,’ असे शिरसाट म्हणाले.
उमेदवार ठरणार ३० ऑक्टोबरला ?
छत्रपती संभाजीराजे यांनी मनोज जरांगे-पाटील यांना स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून मराठा समाजातील उमेदवार उभे करण्याच्या केलेल्या आवाहनास जरांगे-पाटील यांच्याकडून प्रतिसाद नसल्याचे सांगण्यात येत आहे. जरांगे सर्व उमेदवार स्वतःच निवडून उभे करणार आहेत याची घोषणा ते तीस अथवा एक तारखेला करणार आहेत असे सांगण्यात आले.