‘इंचभरही जमीन देणार नाही’
पंतप्रधानांचा शत्रूराष्ट्रांना इशारा
वृत्तसंस्था, भुज (गुजरात) : ‘देशाच्या सीमेवरील एक इंचही जमीन शत्रूना बळकावू देणार नाही. याबाबत सरकार कोणतीही तडजोड करणार नाही,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शेजारी देशांना ठणकावले. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात सीमेवरील जवानांसोबत पंतप्रधानांनी दिवाळी साजरी केली. त्या वेळी त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
सन २०१४ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी दर वर्षी सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. या उपक्रमात यंदा भारत व पाकिस्तानच्या सीमेवरील सर क्रीकची निवड करण्यात आली होती. ‘आपल्या देशाचा भूतकाळ पाहता राजनैतिक चर्चेच्या बुरख्याआड याच क्षेत्राचे युद्धभूमीत रूपांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना शत्रूच्या या कारवायांविरोधात आवाज उठवला होता. या सीमेवर शत्रूचा दीर्घ काळ डोळा होता; परंतु डोळ्यांत तेल घालून तुम्ही या सीमेचे रक्षण करीत असल्याने आपले देशवासीय निश्चिंत आहेत. तुमच्या या सामर्थ्यांची शत्रूलाही जाणीव आहे,’ असे ते जवानांना उद्देशून म्हणाले.
‘आपला देश, देशातील नागरिक तुमच्यामुळेच सुरक्षित आहेत, जग तुमच्याकडे पाहते तेव्हा त्यांना आपल्या देशाची ताकद लक्षात येते. याच ताकदीमुळे शत्रूना त्यांच्या कारवायांतील फोलपणा लक्षात येतो,’ अशा शब्दांत पंतप्रधानांनी तिन्ही दलाच्या जवानांचा व अधिकाऱ्यांचा गौरव केला. ‘सीमेवरील एक इंचही जमीन कोणाला बळकावू देणार नाही, असे सरकार आता आपल्या देशात सत्तेत आहे. लष्कराच्या सामर्थ्यावर आमच्या सरकारचा पूर्ण विश्वास आहे,’ असे ते म्हणाले. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील डेमचोक व देप्सांग या वादग्रस्त बिंदूंवरून सैन्यमाघारी करण्याबाबत भारत व चीनमध्ये झालेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान महत्त्वपूर्ण मानले जाते.