अनाथ मुलांसोबत ‘ शांतिदूत ‘ ची दिवाळी
मिठाई व फराळाचे वाटप करून आनंद साजरा
परभणी : येथील शांतिदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने दीपावलीनिमित्त अनाथाश्रमात राहणार्या मुलांना मिठाई व फराळाचे वाटप महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांच्या हस्ते करण्यात आले. श शांतिदुतच्या जनता मार्केट रोडवर असलेल्या कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य बाळासाहेब जाधव, डॉ दिनेश भुतडा, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, वर्षा सारडा, रफिक भाई हे उपस्थित होते. मागील ३० वर्षापासून दरवर्षी दिपावलीनिमित्त मिठाई व फराळ वाटपाचा कार्यक्रम शांतिदुतच्या वतीने राबविण्यात येतो. त्यानुसार परभणी शहरातील विविध अनाथ आश्रमात राहणार्या मुलांना मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी शांतिदूच्या या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करून या फराळ व मिठाई वाटपामुळे अनाथ मुलांनाही दीपावली साजरी करता येणार आहे. समाजाने अनाथ तसेच गोरगरिबांच्या जीवनातही सणाचा आनंद देण्यासाठी शांतीदुतप्रमाणे पुढे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अनाथ आश्रमातील जवळपास १०१ मुलांना मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केशव सारडा, माधव सारडा, सेजल सारडा, करण सारडा यांनी परिश्रम घेतले.