भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना धडा शिकवा : शरद पवार

भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना धडा शिकवा : शरद पवार

सेलूतील जाहीर सभा : महाविकास आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारार्थ पवारांच्या सभेला मोठी गर्दी

भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना धडा शिकवा : शरद पवार

सेलू/परभणी : शेतकऱ्यांवर अन्याय करणारांना सत्तेत राहाण्याचा अधिकार नाही. आज राज्यातील शेतकरी अडचणीत आले असून आत्महत्या वाढल्या आहेत. तरुण बेरोजगार आहेत. महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगारी, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर बोकाळला आहे. अशा परिस्थितीत सत्तेचा गैरवापर करून आपल्या जवळच्यांचे भले करणाऱ्यांना आणि भ्रष्टाचाऱ्यांना साथ देणाऱ्या मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, सत्ताधाऱ्यांना राज्यातील विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी ( ८ नोव्हेंबर) सेलू (जि.परभणी) येथे केले.

जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विजय माणिकराव भांबळे याच्या प्रचारार्थ सेलू येथील नूतन विद्यालयाच्या मैदानावर दुपारी चार वाजता श्री.पवार यांची जाहीर सभा  झाली. त्यावेळी ते बोलत होते. परभणीचे शिवसेना (उबाठा) खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, उमेदवार विजय भांबळे, जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजय गव्हाणे, व्यंकटराव कदम, संजय साडेगावकर, सोनाली देशमुख, प्रेक्षा भांबळे, हेमंतराव आडळकर, शिक्षक सेलचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, राजेंद्र लहाने, अशोक काकडे, नामदेव अप्पा डख, पवन आडळकर, मनीषा केंद्रे आदींसह महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी आणि मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने महाविकास आघाडीला भरभरून प्रतिसाद दिला. विधानसभा निवडणुकीमध्येही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि घटक पक्षांना साथ देऊन महाविकास आघाडीच्या हाती सत्ता द्या, महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलवून टाकू, अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली. या वेळी बोलताना खासदार संजय जाधव यांनी जिंतूरच्या विद्यमान भाजप आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध असणारे विजय भांबळे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन सूत्रसंचालन ॲड. विनोद राठोड, परवेज सौदागर यांनी केले. अशोक काकडे यांनी आभार मानले. सभेला जिंतूर, सेलू तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनतेच्या हिताच्या ‘ गॅरंटी ‘

देशात नेहमी क्रमांक एकवर असणारे महाराष्ट्र राज्य सहाव्या क्रमांकावर पिछाडीवर फेकेले गेले आहे, असे नमूद करून महिलांसाठी महालक्ष्मी योजनेतून दरमहा तीन हजार रूपये. सर्व महिलांना मोफत एसटीचा प्रवास, शेतकऱ्यांना तीन लाख रूपयाची कर्जमाफी, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये प्रोत्साहन मदत, यासोबतच जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटविली जाईल. सुशिक्षित बेरोजगार तरूणांना दरमहा ४ हजार रूपये भत्ता आणि वैद्यकिय उपचारासाठी २५ लाख रूपये पर्यंतची मदत, या जनतेच्या हिताच्या गॅरंटी महाविकास आघाडीने दिल्या आहेत, असेही श्री.पवार म्हणाले.

‘नूतन’च्या गौरवशाली परंपरेला उजाळा

स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ, श्रीरामजी भांगडिया, चारठाणकर यांनी सेलू शहराच्या विकासात दिलेल्या योगदानाचा आणि त्यागाचा उल्लेख शरद पवार यांनी आपल्या भाषणात केला. सेलूतील नूतन विद्यालय शिक्षण संस्था आणि नूतन महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरेलाही श्री पवार यांनी या वेळी उजाळा दिला.

भांबळे झाले भावूक

या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात पैशांचा महापूर येणार आहे. मोठ मोठी आमीषे दाखविली जातील. परंतु, माझ्याकडे पैसा नाही. मी विकासासाठी काम करणार आहे. मी कुणाचा एक रूपयाही खाल्ला नाही. त्यामुळे सर्व स्तरातील मतदारांनी मला एकवेळ अवश्य संधी द्यावी. मी आयुष्यभर आपली सेवा करेल, अशी भावनिक साद सभेत घालतांना उमेदवार विजय भांबळे हे शेवटी अत्यंत भावूक झाले होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!