मतदान करा, सहलीला जाऊ नका
राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे आवाहन, शिवचेतना रॅलीचे लातूरमध्ये उत्स्फूर्त स्वागत
लातूर : ‘दुबई, मस्कतहून भारतात मतदान करण्यासाठी विमाने भरभरून येतात; परंतु गल्लीत राहणारी शहाणी, सुशिक्षित माणसे मतदान करीत नाहीत. त्यांना करंटेच म्हटले पाहिजे. मतदान हा जसा अधिकार आहे; तसेच ते पवित्र कर्तव्य आहे. त्यामुळे देश, धर्म आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी सर्वांनी शंभर टक्के मतदान करावे,’ असे आवाहन श्रीराम जन्मभूमी न्यासचे उपाध्यक्ष राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नव्या पिढीला जागृत करण्यासाठी आचार्य गोविंददेव गिरी महाराज यांनी शिवचेतना रॅली काढली आहे. गुरुवारी रात्री या रॅलीचे लातूरात स्वागत करण्यात आले. त्यानिमित्ताने संतसंदेश सभेचे आयोजन भारत विकास परिषदेने केले होते. संतसंदेश सभेत गोविंददेव गिरी महाराज यांनी छत्रपतींच्या कर्तृत्वाची महिती सांगितली. ‘त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांसमोर आव्हाने उभी होती, तशीच आव्हाने आताही आहेत. मी कोण्या उमेदवाराला मतदान करा असे सांगत नाही; परंतु जो हिंदू संस्कृती, सनातन धर्म, गोरक्षा याच्या संरक्षणासाठी काम करतो, त्या पक्षाला, उमेदवाराला विजयी करणे ही काळाची गरज आहे. पालघरमध्ये झालेली दोन साधूंची हत्या आजही स्मरणात कायम आहे. या साधूंना पोलिसांनीच मारेकऱ्यांच्या ताब्यात दिले हे विसरता येणार नाही,’ अशी आठवण त्यांनी सांगितली.
‘सर्वसामान्य खेड्यात राहणारा माणूस मतदान केल्याशिवाय राहत नाही; पण श्रीमंत आहेत, सुशिक्षीत आहेत ते मात्र मतदानाच्या दिवशी सहलीला जातात. मतदान हा फक्त अधिकार नाही, ते पवित्र कर्तव्य आहे,’ असे आवाहन गोविंददेव गिरी यांनी केले. या संमेलनाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.