महाभ्रष्ट खोकेबाज सरकारला हद्दपार करा
कॉंग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी यांचे पाथरीतील सभेत आवाहन
परभणी : केंद्रातील सत्ताधींशाना वाटते की, महाराष्ट्राला दिल्ली, गुजरातमधून रिमोंट कंट्रोलने चालवू. पण, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या वीरांची ही आंदोलन भूमी आहे. हा देश संविधानाने चालतो. महाराष्ट्राला त्याच्या अस्मितेसोबत स्वीकारावे लागेल, याचा विसर हुकूमशाही भाजप आणि महायुती सरकाराला पडला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत महाभ्रष्ट धोकेबाज आणि खोकेबाज सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करा, असे आवाहन कॉंग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी यांनी केले आहे.
पाथरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार आमदार सुरेशराव वरपुडकर यांच्या प्रचारार्थ पाथरी येथे सोमवारी, ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी खासदार प्रतापगढी यांची जाहीर सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी परभणीचे शिवसेना (उबाठा) खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, उमेदवार सुरेशराव वरपुडकर, माजी आमदार विजयराव गव्हाणे, सुरेशराव देशमुख, अजिंक्य चांदणे आदींसह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होते.
खासदार प्रतापगढी यांनी आपल्या भाषणातून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारावर जोरदार टिका केली. ते म्हणाले की, या सरकारने तोडो आणि फोडो ही निती अवलंबवून सातत्याने जाती-पाती आणि धर्माचे राजकारण केले. देशात महागाई, बेरोजगारी, महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रात १० लाख कोटी रूपयाच्या गुंतवणुकीतून उभारले जाणारे मोठमोठे प्रकल्प गुजरातला पळविण्यात आले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पाडून महायुतीचे भ्रष्ट सरकार लादण्यात आले.
प्रतापगढी म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेची ही लढाई; व्देष आणि प्रेम, विश्वास आणि गद्दारी अशी आहे. महाविकास आघाडीला दिलेले प्रत्येक मत हे राहुल गांधी, उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पारड्यात जाणार आहे. त्यामुळे ‘कटेंगे तो बटेंगे’ च्या जाळ्यात न अडकता; जाती-पाती, धर्माचा कोणताही विचार न करता पाथरीच्या निवडणुकीत सुरेश वरपुडकर यांना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा आणि महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा विराजमान करा, असे आवाहन खासदार प्रतापगढी यांनी केले.