बंधाऱ्यामुळे १८७ एकर क्षेत्रावरील पिकांना सिंचनाला लाभ
सेलूजवळील मोरेगाव कोल्हापुरी बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा, पिण्याच्या पाणी प्रश्नही दिलासा
सेलू /परभणी : सेलू तालुक्यातील दुधना नदीवरील मोरेगाव कोल्हापुरी बंधाऱ्यात ऑक्टोबरमध्ये जलसाठा केल्याने परिसरातील ७५ हेक्टर म्हणजेच जवळपास १८७ एकरपेक्षा अधिक शेत जमिनीवरील रब्बी हंगामातील पिकांना सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. तसेच बंधाऱ्यात समाधानकारक पाणीसाठा असल्याने परिसरातील सहा गावांना आगामी काळात पाणीटंचाई पासून दिलासा मिळणार आहे.
सेलू तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना नदीवर ब्रम्हवाकडी येथे निम्न दुधना सिंचन प्रकल्प आहे. सेलू, परतूर, मंठा तसेच जालना जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेला पाणी देण्यात येते. खरीप तसेच रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यातून पाण्याचे चार आवर्तन दिले जातात. याचा सेलू, मानवत, जिंतूर व परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ मिळतो. १९९६ साली दुधना नदीवर मोरेगाव येथे कोल्हापुरी बंधारा उभारण्यात आला होता. दुधना प्रकल्पात २०१० पासून पाणीसाठा केला जात आहे. गेल्या दोन वर्षापासून प्रकल्पात ७५ टक्केच जलसाठा ठेवण्यात येत आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रकल्पात वेगाने पाणीसाठा निर्माण होतो. ७५ टक्के जलसाठा केल्यानंतर उर्वरित विसर्गाव्दारे नदीपात्रात सोडण्यात येते. यंदाही दुधनेतून नदीपात्रात तब्बल ९६ दलघमी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच मोरेगाव येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे बंद करून मुबलक पाणीसाठा करण्यात आला आहे. सद्यस्थिती बंधाऱ्यात समाधानकारक पाणीसाठा आहे. त्याचा परिसरातील सुमारे ७५ हेक्टर जमिनीवरील पिकांना सिंचनासाठी लाभ होणार आहे.
सहा गावांना पाणी प्रश्नी दिलासा
दुधना नदीपात्रात मोरेगाव, खुपसा, वाघ पिंप्री, घोडके पिंप्री, खादगाव, ब्राम्हणगाव प्र.प. आदी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. मोरेगाव येथील कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाणीसाठ्यामुळे विहीरी तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई पासून या सहा गावांना दिलासा मिळणार आहे.