ओबीसींचे आरक्षण वाचविण्याचा लढा : प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे यांच्या प्रचारार्थ जिंतूर येथे सभा; महिला, नागरिकांची मोठी गर्दी
परभणी : विधानसभेची ही निवडणूक आरक्षण वाचविण्यासाठीची लढाई आहे. ‘वंचित’ चे आमदार निवडून आल्याशिवाय हे होणार नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करून बळ द्या आणि ओबीसींचे आरक्षण वाचवा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी, १७ नोव्हेंबररोजी केले आहे. जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे यांच्या प्रचारार्थ जिंतूर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत आंबेडकर बोलत होते. या वेळी उमेदवार सुरेश नागरे, अमृता नागरे, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, प्रसाद बुधवंत, नानासाहेब राऊत, संंजय साडेगावकर आदींसह पदाधिकारी व ओबीसी नेत्यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. सभेला मोठ्या संख्येने महिला, नागरिक उपस्थित होते.
आंबेडकर यांनी आपल्या भाषणात कॉंग्रेस आघाडी आणि भाजप महायुतीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा निवडणूक लागण्याअगोदर सुप्रीम कोर्टाने एका निकालाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला हरकत नाही, असे स्पष्ट केले. पण, ह्या निवडणुका घेत असताना २७ टक्के ओबीसी आरक्षण लागू होणार नाही, असे त्यामध्ये नमूद केले आहे. हा निर्णय चुकीचा आहे. परंतु, कुठलाही राजकीय पक्ष या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाही. जरांगे पाटलांनी आपले आंदोलन मागे घेतले. त्यामागचा हेतूसुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले.
धानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडी आणि भाजपच्या महायुतीने ओबीसीला उमेदवारी दिली नाही. नवीन विधानसभा गठित झाली, की ठराव मंजूर करून ओबीसींचे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये असलेल्या आरक्षणांना स्थगिती देण्यात येईल. ओबीसींनी हे वेळीच ओळखणे आवश्यक आहे. एससी आणि एसटीच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने वर्गीकरणाचा निर्णय दिला आहे. एकदा का ते कुटुंब क्रिमिलियरमध्ये आले, की त्यांना पुढे आरक्षण मिळणार नाही. हा निर्णय रद्द करून आरक्षण वाचविण्याची गरज आहे. वंचित बहुजन आघाडीबद्दल मुस्लिम समाजामध्ये अपप्रचार चालविणारी काँग्रेसची बांडगुळे आहेत, असा आरोप आंबेडकर यांनी केला. शेवटी जिंतूरातील गावगुंडांना या निवडणुकीत हद्दपार करून नागरे यांना विजयी करा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. सभेला मोठ्या संख्येने महिला, नागरिक उपस्थित होते.
जिंतूर-सेलूची जनता बदल घडविणार : सुरेश नागरे
आजी, माजी आमदार असलेल्या बोर्डीकर आणि भांबळे यांनी गेल्या वीस वर्षांत कोट्यावधींचा निधी आणून फक्त स्वतःचा विकास केला, असा आरोप उमेदवार सुरेश नागरे यांनी सभेत बोलताना केला. मी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण मी ओबीसीमध्ये जन्म घेतला, ही काय माझी चूक आहे का ? असा प्रश्न उपस्थित करून प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या संधीचे मी सोने करून दाखविणार आहे. जिंतूर, सेलू तालुक्यातील लोकांमध्ये आजी, माजी आमदाराविरूद्ध प्रचंड आक्रोश असून, या वेळी जनता नक्कीच बदल घडविणार आहे, असा विश्वास नागरे यांनी व्यक्त केला.