विधानसभा निवडणूक २०२४ : मतदान साहित्य घेऊन कर्मचारी रवाना

विधानसभा निवडणूक २०२४ : मतदान साहित्य घेऊन कर्मचारी रवाना

परभणी : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानासाठी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, जिंतूर व पाथरी या विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर मतदानाचे साहित्य सोबत घेऊन कर्मचारी मंगळवारी (१९ नोव्हेंबर)
गर्दी केली होती. साहित्य घेऊन कर्मचारी केंद्रावर रवाना झाले. परभणी येथील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात निवडणूक निरीक्षक के. हरिता, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, परभणी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्या उपस्थितीत पथके रवाना झाली. पाथरी येथे निवडणूक निरीक्षक संचिता बिष्णोई यांनी वांगी व नीलवर्ण टाकळी येथील मतदान केंद्र पथकाच्या वाहनास पुष्पहार घालून प्रथम रवाना केले. या नंतर पाथरी विधानसभा मतदार संघातील एकूण ४१५ मतदान केंद्रासाठीचे साहित्य घेऊन नियुक्त मतदान अधिकारी वाहनांनी रवाना झाले. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी, श्री दासे, तहसीलदार शंकर हांदेशवार, पांडुरंग माचेवाड, मुख्याधिकारी तुकाराम कदम, वाहन पथक प्रमुख मदन चव्हाण उपस्थित होते. जिंतूर मतदारसंघातील मतदान केंद्रावरील नियुक्त पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी साहित्य हस्तगत करून तपासून घेतली. या वेळी निवडणूक निरीक्षक के.हरिता यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मतदान पथके विविध वाहनाने मतदान केंद्रावर रवाना झाली. सायंकाळी पाच वाजता सर्व मतदार केंद्रावर पथके पोहोचली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली. या वेळी सहायक अधिकारी राजेश सरवदे, डॉ.शिवाजी मगर, युवराज पौळ, सुग्रीव मुंडे आदींची उपस्थिती होती.

निर्भयपणे मतदान करावे

परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सांयकाळी ६ पर्यंत आहे. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. तर मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जनार्धन विधाते, संगीता चव्हाण, संतोषी देवकुळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!