विधानसभा निवडणूक : ग्रामीण भागात ८५ टक्क्यापर्यंत मतदान

विधानसभा निवडणूक : ग्रामीण भागात ८५ टक्क्यापर्यंत मतदान

शांततेत मतदान, केंद्रावर रांगा ; वृद्ध, जेष्ठ नागरिकांनीही बजावला मतदानाचा हक्क

विधानसभा निवडणूक : ग्रामीण भागात ८५ टक्क्यापर्यंत मतदान

परभणी : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात बुधवारी (२० नोव्हेंबर) रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. शहरासह ग्रामीण भागात मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. वृद्ध, जेष्ठ नागरिकांसह महिला मतदारांचाही उत्साह दिसून आला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून निवडणूक निरीक्षक के. हरिता, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगद्वारे लक्ष ठेवून होते. जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड व पाथरी विधानसभा मतदारसंघांत  शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली.मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले
सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. मात्र, या नऊ वाजेपर्यंत बहुतांश भागात धिम्या गतीने मतदान झाले. सकाळी दहानंतर मतदानाचा वेग काहीसा वाढला. पहिल्या चार तासात जिल्ह्यात सरासरी १८.४९ टक्के मतदान झाले होते. दुपारी एक वाजेपर्यंत ३३.१२ टक्के, तर तीन वाजेपर्यंत ४८.८४ टक्के मतदान झाले होते. त्यात गंगाखेड मतदारसंघात सर्वाधिक ५१.७५ टक्के मतदान झाले, त्याखालोखाल जिंतूरमध्ये ४९.२ टक्के, पाथरीत ४८.८, तर परभणीमध्ये ४४.९९ टक्के मतदान झाले. दरम्यान, शहरीभागासह ग्रामीण भागात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी दुपारी दोन वाजेपर्यंत ५५ ते ६० टक्के मतदान झाले होते. काही मतदान केंद्रावर रात्री उशीरापर्यंत मतदारांच्या मोठ्या रांगा दिसून आल्या. ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर ८५ टक्क्यापर्यंत मतदान झाल्याची माहिती आहे. वृद्ध, जेष्ठ नागरिक, महिलांनी मतदानात चांगला सहभाग नोंदविला. मतदानाच्या अनुषंगाने लढतीतील प्रमुख राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरासह ग्रामीण भागातही मतदानकेंद्राबाहेर पेंडॉल टाकले होते. मतदारांना यादीत नाव शोधण्यासाठी कार्यकर्त्याकडून सहकार्य केले जाते होते. याच सोबत मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी ठिकठिकाणी ऑटो रिक्षासह, चारचाकी वाहनांची सोय केल्याचे दिसून आले.

शाहूनगरवासियांचा बहिष्कार

परभणी शहरातील शाहूनगरातील संतप्त नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे पाऊल उचल्याचे दिसून आले. अनेक वर्षापासून रस्ते, नाल्यांसह मूलभूत सोयीसुविधा मिळलेल्या नाहीत. जिल्हा, पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा करूनही साधे रस्ते होत नसल्याने पावसाळ्यात अत्यवस्थ रूग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात तसेच मृतांवर अंत्यसंस्कार करणे जिकिरीचे झाले आहे, असे नागिरकांचे म्हणणे आहे. दरम्यान, पालिका आयुक्तांच्या भेटीनंतर बहिष्कार मागे घेण्यात आला.

उमेदवार, अधिकाऱ्यांच्या भेटी

लढतीतील प्रमुख उमेदवारांसह विविध पक्ष, अपक्ष उमेदवारांनी तसेच महाविकास आघाडी व महायुतीतील आजी, माजी खासदार, आमदार, नेते, पदाधिकाऱ्यांनीही शहरीभागासह ग्रामीण भागातील मतदान केंद्राना भेटी देऊन मतदानाची माहिती घेतली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, निवडणूक निरीक्षक के.हरिता, संचिता बिष्णोई, राजेश दुग्गल, राहुल मिश्रा, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, जनार्दन विधाते, निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे, प्रवीण फुलारी, जिवराज डापकर, शैलेश लाहोटी, डॉ.शिवाजी मगर, पांडुरंग माचेवाड यांच्यासह निवडणूक अधिकाऱ्यांनी विविध केंद्राना भेटी दिल्या.

महानगरातील मतदारही दाखल

परभणी जिल्ह्यातील चारही मतदार संघात मातब्बरांमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आदी महानगरांसह बाहेरगावी वास्तव्यास  असलेल्या मतदारांचे संवाद मेळावे घेऊन त्यांना आपल्या बाजुने मतदान करण्याचे आवाहन प्रमुख उमेदवारांनी केले होते. या पार्श्वभूमीवर रेल्वेसह बस, ट्रॅव्हल्सने जिल्ह्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागात मतदार दाखल होते. या मतदारांनी आपल्या मूळ गावी येऊन मतदानाचा हक्क बजावला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!