विधानसभा निवडणूक : उशीरापर्यंत मतदान केंद्रावर रांगा
मतदान टक्का ७० च्या पुढे सरकणार !
परभणी : परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६२.७३ टक्के मतदान झाले होते. मात्र, काही मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत साडेसात-आठ वाजताही मोठ्या संख्येने मतदार रांगेत होते. त्यामुळे मतदानाचा टक्का सरासरी ७० च्या पुढेही वाढण्याची शक्यता आहे.
जिंतूर विधानसभा मतदारसंघातील आडगाव दराडे, बोरी, आडगाव बाजार, माणकेश्वर, चौधर्णी, चारठाणा, शेवडी, बेलखेडा, जिंतूर व सेलू शहरातील दोन मतदार केंद्रावर सायंकाळी पाच नंतर मतदार मोठ्या प्रमाणात दाखल झाले. तर काही ठिकाणी रात्री साडे सात वाजताही रांगा होत्या. अशा १२ केंद्रावर रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान चालेल, अशी माहिती जिंतूरचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली.