विधानसभा निवडणूक : दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला !

विधानसभा निवडणूक : दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला !

कोण मारणार बाजी ? चार तासात निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता 

परभणी : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील निवडणुका शेवटच्या टप्प्य्यात चुरशीच्या, अत्यंत रंजक आणि सर्वार्थाने आगळ्यावेगळ्या ठरल्या आहेत. जातीय समीकरणांद्वारे मतांचे ध्रुवीकरण, नात्यागोत्यांचे राजकारण, लक्ष्मी अस्त्रांचा मुक्तपणे झालेला वापर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या सोबतच आरोप-प्रत्यारोप, डाव-प्रतिडाव आणि मतांचा वाढलेला टक्का. यामध्ये कोण बाजी मारणार ? मतदानानंतर समर्थकांनी केलेली आकडेमोड, उमेदवारांचा आढावा, स्वयंघोषित विश्लेषकांनी कागदावर साकारलेला विजय, कितपत खरा उतरणार ? या सर्वांची उकल निकालाद्वारे होणार आहे. मात्र, मातब्बरांच्या राजकीय भवितव्याच्या लढाईत, धनशक्ती विरूद्ध जनशक्तीच्या प्रतिष्ठेचाच खरा फैसला आज, शनिवारी (२३ नोव्हेंबर) होत आहे, असे मानले जात आहे.

मातब्बरांचे ठरणार भवितव्य !

जिल्ह्यात विविध पक्ष, अपक्षांसह जिंतूर १७, परभणी १२, गंगाखेड १५, तर पाथरीत १४, असे एकूण ५८ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी तुल्यबळ लढतीत जिंतूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार तथा आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार तथा माजी आमदार विजय भांबळे, कॉंग्रेस बंडखोर तथा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे यांच्यात सामना आहे. परभणीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार तथा आमदार डॉ.राहुल पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आनंद भरोसे यांच्यात थेट लढत आहे. गंगाखेडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार तथा आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विशाल कदम आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तथा माजी आमदार सीताराम घनदाट यांच्यात लढत आहे, तर पाथरीमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार तथा आमदार सुरेश वरपुडकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार तथा आमदार राजेश विटेकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सईद खान गब्बर, अपक्ष उमेदवार माजी आमदार बाबाजानी दुर्राणी आदींमध्ये अटीतटीचा सामना आहे. या सर्व मातब्बरांचे भवितव्य शनिवारी ठरणार आहे.

मतविभाजन, वाढलेली मते निर्णायक

एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी जिल्ह्यात सरासरी ६३.०८ टक्के, २०१९ च्या विधानसभेसाठी ६४.१९ टक्के मतदान झाले होते. लोकसभेच्या तुलनेत ८.३७, तर विधानसभेच्या तुलनेत ७ टक्के मतांची वाढ या निवडणुकीत झाली. या वेळी सरासरी मतदान ७१.४५ टक्के‌ आहे. यामध्ये जिंतूर मतदारसंघात सर्वाधिक ७५.३६ मतदान झाले. १२.९३ टक्के वाढ आहे. गंगाखेड मतदारसंघात ७३.०४ टक्के मतदान झाले असून १०.०४ टक्के वाढ आहे.‌ तर पाथरीमध्ये ७०.९७ टक्के मतदान झाले. ६.७० टक्के वाढ आहे, तर सर्वात कमी ३.११ टक्के वाढ परभणी मतदारसंघात आहे.‌ ही वाढलेली मते तसेच विविध पक्ष, अपक्षांमुळे होणारे मतविभाजन धक्कादायक आणि निर्णायक ठरणार आहेत. यावरच मातब्बरांच्या विजयाचे गणित अवलंबून असणार आहे, असे जाणकार सांगत आहेत.

कार्यकर्त्यांच्या विश्वासाचीही सत्व‌परीक्षा !

महायुती व महाविकास आघाडीसह अन्य पक्ष व अपक्ष मातब्बरांमधील लढती शेवटच्या टप्प्यात अत्यंत चुरशीच्या झाल्या. जातीपातीच्या मतांचे मोठे ध्रुवीकरण झाले. स्थलांतरित मतदारही मोठ्या प्रमाणावर आणले गेले. गंगाखेड, जिंतूरसह पाथरी आणि परभणी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर झालेला धनशक्तीचा वापर आणि याद्वारे लक्ष्य केलेल्या, वळलेल्या मतांच्या हिशोबाची खुलेआम चर्चा होत आहे. यामुळे निकालाच्या अंदाजावरून संभ्रम आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मातब्बर उमेदवारांनी कार्यकर्त्यांवर दाखविलेल्या विश्वासाचीही सत्वपरीक्षा आहे. दरम्यान, मतमोजणी प्रकिया सुरू झाल्यानंतर येणाऱ्या कलावरून कोणत्या उमेदवारांचे समर्थक आनंदावर स्वार होऊन जातील, हे पाहाणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!