पशुगणनेस प्रारंभ : पशुपालकांनी प्रगणकांना अचूक माहिती द्यावी
परभणी : केंद्र पुरस्कृत पंचवार्षिक 21 वी पशुगणना दिनांक 25 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या कालवधीत होणार असून सोमवारपासून (दि.25) पशुगणनेस प्रारंभ झाला आहे. सदर कालावधीत पशुसंवर्धन विभागामार्फत नेमण्यात आलेले प्रगणक घरोघरी जाऊन, पशुधनाची माहिती घेणार आहेत.
सदर पशुधनाच्या माहितीमध्ये कुंटूबामध्ये असलेल्या गाय वर्ग, म्हैसवर्ग, शेळी व मेंढी, वराह, घोडे व गाढवे, कुक्कुट पक्षी इत्यादीच्या संख्येची नोंद करण्यात येणार आहे. या पशुगणनेमध्ये पशुधन संख्येसोबतच पशुधनाच्या प्रजाती, लिंग, वय, इत्यादी बाबीची नोंद करण्यात येणार आहे. या पुर्वीची पशुगणनाही टॅबद्वारे करण्यात आलेली होती. तथापि आताची मोबाईल वरील अॅपद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाने स्वतंत्र अॅपची निर्मिती केलेली आहे.
पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत असलेल्या पशुगणनेमुळे पशुपालकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे (पशुरोग प्रतिबंधक लसीकरण, वैरण बियाणे, पशुखाद्य, पशु औषधी, मुरघास, खनिज मिश्रण, पशुधन विमा इत्यादी) सुलभ होणार आहे. त्याचप्रमाणे नैसर्गीक आपत्ती, वन्यजीवाकडून मृत्यू, गोशाळेतील पशुधनास अनुदान, पशु सांसर्गिक रोग प्रादुभावामुळे मृत्यू, विजेच्या संपर्कमुळे मृत्यू इत्यादी कारणाने पशुपालकांना मिळणाही नुकसान भरपाई मिळणेही सोईचे व सुलभ होणार आहे.
पशुसंवर्धन विभागामार्फत नेमण्यात आलेले प्रगणक घरी आल्यानंतर पशुपालकांनी त्यांच्याकडील पशुधनांची अचूक माहिती पशुपालकांनी प्रगणकांना द्यावी, असे अहवान पशुसंवर्धन विभागामार्फत गणेश देशपांडे, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.