मंत्रिपदासाठी परभणी जिल्हावासियांच्या आशा पल्लवीत !

मंत्रिपदासाठी परभणी जिल्हावासियांच्या आशा पल्लवीत !

आमदार मेघना बोर्डीकरांचे नाव आघाडीवर; विटेकर, गुट्टे समर्थकांच्याही अपेक्षा वाढल्या

बाबासाहेब हेलसकर
परभणी : परभणी जिल्ह्यातून चार पैकी तीन आमदार महायुतीचे निवडून आलेले आहेत. मागील दहा वर्षापासून परभणी जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला आगामी काळात गती मिळण्याच्या दृष्टीने नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात जिल्ह्यातून किमान एकाची तरी वर्णी लागावी, या अनुषंगाने जिल्हावासियांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामध्ये दुसऱ्यांदा विधानसभेत पोहोचलेल्या सेलू -जिंतूरच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे नाव आघाडीवर असून, रासपचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे ( गंगाखेड) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर (पाथरी) यांनाही संधी मिळेल, अशा समर्थकांना मोठ्या अपेक्षा आहेत.
आमदार बोर्डीकर आणि त्यांच्या परिवाराचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांशी चांगले संबंध आहेत. जिंतूरसह परभणी जिल्ह्यातील सत्ताकारणात गेल्या तीस वर्षांपासून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा दबदबा कायम आहे. या निवडणुकीत हक्काचा ओबीसी मतदार इतरत्र वळण्याची भिती असतांनाही, बोर्डीकर यांनी पुन्हा बाजी मारली आहे. महिला म्हणून‌ बोर्डीकर यांना निश्चितपणे संधी मिळेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भावी मंत्री म्हणून सेलू, जिंतूर तालुक्यातील बोर्डीकर समर्थकांनी बॅनर झळकावले आहेत. मंत्रीपद मिळावे म्हणून सेलू शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज, श्री शंकरलिंग भगवान मंदिरात अभिषेक करून साकडे घालण्यात आले आहे.
पाथरीचे आमदार विटेकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत विश्वासातील आहेत. लोकसभेच्या वेळी त्यांनी उमेदवारीवर पाणी सोडले. अजित पवार आणि महायुतीसोबत निष्ठेने कार्यरत राहिले आहेत. त्याचे फळ त्यांना चार महिन्यापूर्वीच विधानपरिषद सदस्यत्व दिले गेले. तरीसुद्धा अजित पवार यांच्या शब्दाखातर पुन्हा ते विधानसभेच्या रिंगणात उतरले आणि मातब्बरांचा पराभव करून विजयी झाले आहेत. त्यामुळे विटेकरांना पहिल्याच संधीत मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा समर्थकांतून व्यक्त केली जात आहे. रासपचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांचेही महायुतीतील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यांचेही कार्यकर्ते मंत्रिपदाची आशा धरून आहेत.

…तर हक्काचा पालकमंत्री मिळेल !

मागील दहा वर्षांपासून परभणी जिल्ह्याच्या वाट्याला लाल दिवा आला नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना (उबाठा) आमदार डॉ.राहुल पाटील तसेच काँग्रेसचे सुरेश वरपुडकर यांना, तर महायुती सरकारच्या काळात बोर्डीकर तसेच गुट्टे यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. परिणामी अन्य जिल्ह्यातील मंत्र्यावर पालकमंत्री म्हणून जबाबदारी आली. धनंजय मुंडे, तानाजी सावंत, संजय बनसोडे आदी पालकमंत्री म्हणून होते. नव्या सरकारमध्ये जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले, तर हक्काचा पालकमंत्री मिळेल, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!