देशभरात ‘आंतरभारती दूत’ नेमणार

अमर हबीब यांची माहिती, कुरुक्षेत्रात साजरा झाला आंतरभारती दिन

Authored by Babasaheb Helaskar

कुरुक्षेत्र (हरियाणा) : पूज्य साने गुरुजींनी स्थापन केलेल्या आंतरभारती संस्थेचा, देशभरातील विस्तार अधिक समृद्ध करण्यासाठी येत्या वर्षात जिल्ह्या जिल्ह्यात ‘आंतरभारती दूत’ नेमले जाणार आहेत, अशी माहिती आंतरभारतीचे राष्ट्रीय सचिव अमर हबीब यांनी मंगळवारी (१० मे) दिली.
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले व्हावे, यासाठी साने गुरुजींनी उपोषण केले होते. दहा मे रोजी मंदिर खुले करण्यात आले. हा दिवस आंतरभारती दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी कुरुक्षेत्र (हरयाणा) येथे हा दिवस साजरा करण्यात आला. त्या वेळी हबीब बोलत होते.
अध्यक्षस्थानी आंतरभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य सदाविजय आर्य होते. प्रमुख पाहुण्या म्हणून इंदौर येथील सेवानिवृत्त जिल्हाधिकारी सूरज दामोर उपस्थित होत्या. या वेळी पुष्पां उतकर (औरंगाबाद), डॉ. डी.एस.कोरे (पुणे), संविदा पंड्या (गुजरात) आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी अमर हबीब यांनी आंतरभारतीची आगामी दिशा स्पष्ट करून, विविध कार्यक्रमांची घोषणा केली. ‘आंतरभारती दूत’ ही नवी कल्पना त्यांनी मांडली. एका जिल्ह्यातील कार्यकर्त्याने दुसऱ्या जिल्ह्यात काम उभे करणे, अशी ही कल्पना आहे. जबाबदारी घेणाऱ्या कार्यकर्त्याला आंतरभारती दूत म्हटले जाणार आहे. बैठकीत अनेकांनी आंतरभारती दूत होण्याची इच्छा व्यक्त केली. महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रचार व्हावा, यासाठी आंतरभारतीतर्फे राष्ट्रीयस्तरावर निबंध स्पर्धा घेतली जाईल. त्यासाठी अमर हबीब, संगीता देशमुख व कल्पना हेलसकर यांची त्रिसदसीय समिती निश्चित करण्यात आली. लातूर येथे नोव्हेंबर महिन्यात युवती शिबीर होईल, असे डॉ बी.आर.पाटील यांनी सांगितले; तसेच लातूर जिल्ह्यात शिक्षकांची शिबिरे घेण्यात येणार आहेत. गुजरातमध्ये युवक शिबीर घेण्याची जबाबदारी संविदा पंड्या यांनी घेतली.

या वेळी शिवलिंग मठपती (उदगीर), डॉ.डी.एस.कोरे (पुणे) संजय माचेवार (वसमत) यांना २०२०-२१ च्या उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात आले. दुसर्‍या सत्रात ‘नारी के सहभाग बिना हर बदलाव अधुरा है’ या विषयावर परिसंवाद झाला. पुष्पां उतकर (औरंगाबाद), मनीषा यादव (अकोला) , संविदा पंड्या (गुजरात), मीनाक्षी स्वामी, अरुणा चिमेगावे (उदगीर) व अमर हबीब (आंबाजोगाई) आदींनी परिसंवादात भाग घेतला. डॉ. डी.एस.कोरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी देशभरातील तीनशेहून अधिक कार्यकर्ते,समर्थक उपस्थित होते.

पंजाब-हरयाणा-हिमाचल दर्शन

आंतरभारतीतर्फे भारत दर्शन मोहीमे अंतर्गत ११ ते १९  मे या कालावधीत पंजाब, हरयाणा व हिमाचल प्रदेश दर्शन यात्रा काढण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अडीचशे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!