
Authored by Babasaheb Helaskar
परभणी : सेलू (जि.परभणी) तालुक्यातील वालूर येथील प्राचीन पुष्करिणी ( बारंव) संवर्धनासाठी संपूर्ण गाव एकवटले असून, दोन दिवसांच्या रात्रंदिवस श्रमदानातून हेलिकल स्टेपवेल प्रकारातील स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेली बारंव ग्रामस्थांनी स्वच्छ करीत पुनर्जीवित केली.
औरंगाबादचे उपविभागीय अधिकारी डॉ.सुनील भोकरे, सेलूच्या उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, सरपंच संजय साडेगावकर, शैलेश तोष्णीवाल यांच्या पुढाकाराने रविवारपासून वालूर येथील प्राचीन बारवांच्या संवर्धन कार्याने गती घेतली. विलास सोनवणे, प्रभाकर जवळकर, राजेश साडेगांवकर, मारोती बोडखे, मुकुंद मुंढे, दत्ताजी राख, प्रल्हादराव दराडे, भास्कर लांडे, भगवानराव दराडे, वाल्मिकी दराडे, नागेश दराडे, ऋषिकेश राख, कुलदीप राख, बाजीराव बोडखे, मारूती बोडखे, बबन बोडखे, श्रीहरी आबूज, गोपाळ आबूज, मामा जवळकर आदींसह ६८ ग्रामस्थांनी श्रमदान केले. जिल्ह्यात सर्वाधिक चार व सुंदर रचनेच्या बारवा वालूरमध्ये आहेत हे विशेष. ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी वालूरकरांनी केलेला निर्धार प्रेरणादायी ठरत असून, बारवेचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी अभ्यासक व पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती.