‘पेपरवाल्या मामां’चा प्रवास अखेर थांबला…

मुक्तिराम गुंजकर यांचे सेलूत निधन, विविध स्तरांतून हळहळ

Authored by Babasaheb Helaskar

परभणी : मुक्तिराम अप्पाराव गुंजकर (वय ६५, रा.श्रीकृष्ण नगर, पाथरी रोड, सेलू ) यांचे बुधवारी (१८ मे) उपचारादरम्यान निधन झाले. आणि गेल्या ३८ वर्षांहून अधिक काळ हरेक वृत्तपत्रांच्या माध्यमातून ज्ञान, विज्ञान, मनोरंजन, माहिती, घटना, घडामोडींच्या बातम्या घरोघरी पोहोचविणार्‍या मुक्तिराम मामांचा वृत्तपत्र सेवेचा अखंड प्रवास अखेर थांबला. या दुर्देवी घटनेनंतर शहरातील विविध स्तरातील नागरिक, वाचकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
रविवारी (१४ मे) दुपारी पाचव्या सुमारास, छतावर वाळत घातलेले गहू पायऱ्यांवरून आणतांना मामांचा तोल गेला. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. परभणी येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. परंतु  उपचारादरम्यान बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. बालाजी न्यूज पेपर एजन्सीच्या स्टॉलचे प्रतिनिधी शिवाजी हावळे यांचे ते व्याही होत.
मुक्तिराम मामा हे सेलू शहरातील खोना न्यूज पेपर एजन्सीमध्ये एक नोव्हेंबर १९८४ पासून वृत्तपत्र वाटपाचे काम करीत होते. त्यांनी अत्यंत सचोटीने, निर्धारपूर्वक आणि प्रामाणिकपणे वृत्तपत्र वाटपाचे व्रत  घेतले होते. मनमिळावू स्वभावामुळे ते अल्पावधीतच वाचक प्रिय झाले होते.
मामा, सुरुवातीला सरस्वती जिनिंगमध्ये रोजमजुरी करून, खोना न्यूज पेपर एजन्सी मध्ये पेपर वाटपाचे काम करीत. ज्या वेळी पुणे येथील सकाळ सारख्या वृत्तपत्रांच्या शहर, डाक आवृत्या दुपारनंतर यायच्या, तर महाराष्ट्र टाइम्स सायंकाळी येत असे, त्यावेळी सरस्वती जिनिंगमधील काम आटोपून मामा सायंकाळीसुद्धा वृत्तपत्रे वाटप करीत. क्वचित बाहेरगावी गेले, तरच त्यांचे पेपर वाटप थांबायचे. ऊन, वारा, पाऊस आणि थंडीचीही तमा न बाळगता, अगदी करोनाच्या काळातही त्यांनी घरोघरी जाऊन वृतपत्र वाटप केले. अशा भावना पूनमचंद खोना यांनी व्यक्त केल्या. एक अतिशय सज्जन, कष्टाळू व प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून मुक्तिराम गुंजकर यांची ओळख होती, अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार डी.व्ही.मुळे यांनी श्रद्धांजली वाहिली. मामांच्या अवचित जाण्याने विविध स्तरातील नागरिक, वाचकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

सच्चा सदस्य गमावला

घटनेच्या आदल्यादिवशी मुक्तिराम मामांनी पेपर वाटले होते. त्यांचा व्यवहार पारदर्शक होता. मेहनत, चिकाटीने ते आयुष्य जगले. वृत्तपत्र वाटपाची प्रामाणिकपणे सेवा दिली. त्यांच्या दुर्दैव निधनाने परिवारातील एक सच्चा सदस्य गमावल्याची भावना आहे. खोना परिवार व सेलूतील सर्व पत्रकार बांधव मुक्तिराम मामांच्या कुटुंबीयांसोबत कायम आहेत.

जयचंद खोना, पत्रकार तथा संचालक, खोना न्यूज पेपर एजन्सी, सेलू जि.परभणी

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!