एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करा
सेलूच्या शिवसैनिकाचे केंद्रीय गृहमंत्र्यांना रक्ताने पत्र
सेलू/परभणी : विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला बंपर बहुमत मिळाले आहे. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला आयोजित करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही मुख्यमंत्री कोण ? याची अधिकृत घोषणा झालेली नाही. या अनुषंगाने शिवसेनेचे सेलू (जि.परभणी ) तालुकाप्रमुख पवन आप्पाराव घुमरे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करा, अशी मागणी या पत्राद्वारे घुमरे यांनी केली आहे. पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश, हे केवळ शिंदे यांच्या नेतृत्वामुळेच आपण गाठू शकलो आहोत. नि:संकोचपणे मुख्यमंत्री पदासाठी शिंदे यांच्यावर पुन्हा जबाबदारी सोपावावी आणि जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण करावी, अशी विनंती गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे. रक्ताने पत्र लिहितांनाचा पवन घुमरे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.