दिव्यांग दिन : सेलू पालिकेने दिव्यांगांचे प्रश्न तत्काळ निकाली काढावेत

दिव्यांग दिन : सेलू पालिकेने दिव्यांगांचे प्रश्न तत्काळ निकाली काढावेत

जिपचे माजी सभापती अशोक काकडे यांची मागणी, सेलूमध्ये दिव्यांग मेळावा उत्साहात

सेलू : दिव्यांग भवन, दिव्यांगाच्या घरकुलाचा प्रश्न, दिव्यांगांच्या व्यावसायासाठीच्या जागेचा प्रश्न, नगरपालिकेकडून मिळणारे अनुदान आदी नगरपालिकेकडून सोडवले जाणारे प्रश्न मागील चार वर्षापासून प्रलंबित आहेत. यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला. अर्ज, विनंत्या केल्या आहेत. परंतु सेलू नगरपालिका प्रशासनाने कुठल्याच प्रश्नाची सोडवणूक केली नाही. ही खेदाची गोष्ट आहे. यानंतरच्या काळात सेलू नगरपालिकेने दिव्यांगांच्या प्रश्नावर निर्णय नाही घेतल्यास, दिव्यांग संघटनेच्या वतीने नगरपालिकेच्या समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचाही निर्धार कै.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचे सेलूचे अध्यक्ष तथा बळीराजा संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी जि.प.सभापती अशोक काकडे यांनी बोलून दाखविला.

सेलू येथील हुतात्मा स्मारक येथे संघर्ष दिव्यांग संघटनेच्या वतीने मंगळवारी, तीन डिसेंबररोजी दिव्यांगदिनानिमित्त दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षीय भाषणात श्री.काकडे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीललदार श्री मोरे, उपमुख्य अधिकारी श्री चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते कॉ.अशोक उफाडे, प्राध्यापक डॉ.राजाराम झोडगे, अव्वल कारकून  हरीष टाक, श्याम आढे, महेंद्र कोठेकर, राजेश ढवळे, नासेर भाई, पत्रकार अबरार बेग आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी प्रा.डॉ.राजाराम घोडके यांनी ‘जगभरात आणि देशात दिव्यांगांची लोकसंख्या सात ते आठ टक्के असून एकट्या महाराष्ट्रात दिव्यांगची लोकसंख्या सत्तर लाखाच्या आसपास आहे. परंतु एवढी मोठी लोकसंख्या असूनही राज्यकर्ते या समूहाकडे दुर्लक्ष करतात. म्हणून यानंतरच्या काळात आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे शिकावं लागेल. संघटीत व्हावं लागेल. आणि मग संघर्ष करावा लागेल.तरच आपले प्रश्न सुटतील, असे मनोगतातून सांगितले.

अशोक उफाडे यांनी मनोगतातून दिव्यांग यांच्या प्रश्नांवर सविस्तर मांडणी करून येणाऱ्या काळात दिव्यांचे प्रश्न सुटणार नसतील तर संघटित लढा उभा केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी श्री चव्हाण यांनी नगरपालिका प्रशासनाकडून दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. तर नायब तहसीलदार श्री मोरे यांनी तहसीलमार्फत दिव्यांगांच्या प्रत्येक मागणीची पूर्तता अद्यापपर्यंत करण्यात आलेली आहे. यानंतरही अंत्योदय योजनेचा प्रश्न असेल अथवा दिव्यांगाच्या मानधनाचा प्रश्न असेल, तो वेळेच्या वेळी सोडविण्यात येईल, असे आश्वासन देत दलालांकडून दिव्यांगांची होणारी पिळवणूक थांबवण्याचे हमी यावेळी नायब तहसीलदार श्री मोरे यांनी दिली.

प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष किशोर साळवे यांनी केले. यात त्यांनी दिव्यागांच्या समस्या मांडून शासन प्रशासनाच्या स्तरावरून सोडविण्याची मागणी केली. या मेळाव्यात कै.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने दिव्यांग बंधू -भगिनींना भेट वस्तू देऊन दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघर्ष दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष अब्रार पठाण, शेखर अबरार,सल्लागार जावेद पठाण, पप्पू चव्हाण, शेख नासर, प्रकाश भाले, यांच्यासह सदाशिव राखुंडे, गोविंद अवसारे, सय्यद चांद भाई ,शेख अस्मा, सलमा पठाण, शेख अहमद, रामराव घुले, रामभाऊ भगत, गणेश पडोळे , माजिद बागवान, संदीप फुलारे, अमित राठोड, शे. हामजाभाई, ज्योती गायकवाड , रेखा चव्हाण, बेबी साळवे,  संगीता पवार,  मंगल शिंदे, अंजना वखरे,  संगीता मोरे,  गीता डाके, जनाबाई चव्हाण, शेख शकीलआदींनी प्रयत्न केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!