सेलूत सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा
बांग्लादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराचा तीव्र निषेध
सेलू/परभणी : बांग्लादेश येथे हिंदू समाजावर होत असलेले क्रूर अत्याचार तथा मठ मंदिरांची विटंबना याचा निषेध म्हणून सेलू येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगळवारी, १० डिसेंबर रोजी सामूहिक विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये विविध स्तरातील हिंदू बांधव भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सेलू येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) परिसरात सकाळी दहा वाजता विविध स्तरातील तसेच विविध संघटनांचे हिंदू बांधव, भगिनी मोठ्या संख्येने जमले होते. अकरा वाजता मोर्चाला सुरूवात झाली. रेल्वेस्टेशन रोड, संत श्री गोविंदबाबा चौक, जवाहररोड, क्रांतीचौक, नूतन रोड मार्गाने शिवतीर्थ परिसरात मोर्चाचा समारोप झाला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रशासनामार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. नायब तहसीलदार विजय मोरे यांनी निवेदन स्वीकारले.
बांगलादेशीय अल्पसंख्यांक हिंदूंच्या मानवाधिकार, मालमत्ता आणि जीवांचे संरक्षण करण्यात यावे, हिंदूंच्या धार्मिक स्थळ आणि मंदिरांचे संरक्षण, इस्कॉनचे चिन्मय कृष्ण महाराज आणि त्यांचे सहकारी तसेच, इतर हिंदू धर्माचार्यांची केलेल्या बेकायदेशीर अटकेतून तात्काळ सुटका व्हावी, हिंदू मुली व महिलांवरील अमानवीय अत्याचार आणि त्यांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन तात्काळ थांबावेत, बहूसंख्य मुस्लिम कट्टरपंथीयांकडून होत असलेले हिंदूंचे धार्मिक उत्पीडन तत्काळ थांबवावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. परभणी शहरातील शनिवार बाजारपासून मुख्य रस्त्याने सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिला व पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.