अफवांवर विश्वास ठेवू नका
परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व पोलिस प्रशासनाचे आवाहन
परभणी : परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीच्या अवमानाच्या घटनेनंतर शुक्रवारी,१३ डिसेंबररोजी परभणी शहरातील व्यवहार पूर्वपदावर आले. मात्र सायंकाळी सामान्य रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करायला सुरूवात केली. या पार्श्वभूमीवर नागरिक, व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार सुरू ठेवावेत कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सायंकाळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी केले आहे.
दरम्यान, गुरूवारी परभणी जिल्ह्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीस खासदार संजय जाधव, प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे, महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आदींसह समितीचे सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या वेळी उपस्थित सर्वांनी जिल्ह्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासनास पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी यांनी शांततेसाठी तत्परतेने प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे उपस्थितांनी अभिनंदनही केले. जिल्हाधिकारी श्री गावडे म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील शांतता अबाधित राहिल, याची आपण काळजी घेऊ, नुकसानग्रस्तांची पंचनामेची कारवाई सुरू करण्यात आली असून त्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. दोषीवर अवश्य कारवाई केली जाईल. संपूर्ण जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात असून सर्वत्र शांतता आहे. खासदार श्री.जाधव म्हणाले की, घटनेच्या सखोल चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र दिले आहे. कुणीही कायद्याचे उल्लंघन करू नये. दोषींवर कडक कारवाई करावी. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करून प्रशासनाने नुकसान भरपाई मिळवून द्यावी.