शालेय जीवनातील संस्कार अविस्मरणीय : रामनाना पाटील
सेलूतील शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
सेलू : प्रत्येक माणसाच्या जीवनाची जडण घडण कुटुंब, शाळा व समाजात होत असते त्यापैकी शाळेतील ज्ञान व संस्कार प्रत्येकाच्या जीवनातील अविस्मरणीय ठेवा असतात, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष रामनाना पाटील यांनी केले. येथील राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी अध्यक्ष मुंजाभाऊ भिसे, प्राचार्य डॉ.ए.एम.डख, सचिव चंद्रप्रकाश सांगतानी, संचालक प्रल्हादराव कान्हेकर, चंद्रशेखर नावाडे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी लेझीम पथकाचे आकर्षक प्रात्यक्षिक व पुष्पवृष्टी करून २००६ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. “असे घडलो आम्ही ” या सदरात शाळेचे माजी विद्यार्थी रवी राक्षे, महेंद्र बनसोडे, निसार कुरेशी , संदीप वायाळ, नारायण कवडे, नय्यूम पठाण, सुरेखा आवटे, चंद्रकला बागल, विशाल कावळे आदी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आयुष्याच्या जडणघडणीत शाळेतील संस्कार, शिस्त व गुरुजनांच्या मार्गदर्शनाचे महत्व विषद केले.
प्रशालेच्या वतीने सर्व माजी विद्यार्थी व मान्यवरांचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला महापुरुषांच्या २० प्रतिमा व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजनाची मेजवानी दिली. शाळेच्या बांधकामासाठी २ एकर जमीन उपलब्ध करून देणारे मझहर पठाण यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुंजाभाऊ भिसे, चंद्रशेखर नावाडे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक डी.डी.शिंदे, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, ए.जी.पाईकराव, विजय हिरे, संदीप जुमडे यांनी, तर भरत रोडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीआर साखरे ,आरव्ही चव्हाण, आनंद देवधर, उषा कामठे, नानासाहेब भदर्गे, विजय अंभोरे, भारती मुळे, फुलारी, साडेगावकर यांनी परिश्रम घेतले.