सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस पोलिसच जबाबदार
राहुल गांधी यांचा परभणीतील पत्रकार परिषदेत आरोप
परभणी : संविधानाचे रक्षण करणार्या सोमनाथ सूर्यवंशी यास पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळेच न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. ही हत्या असून याला पोलिसच जबाबदार आहेत हे स्पष्ट आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी, २३ डिसेंबररोजी पत्रकार परिषदेत केला. दोषींविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
खासदार गांधी यांनी स्व.सूर्यवंशी या युवकाच्या कुटुंबियांचे दुपारी अडीच्या सुमारास नवा मोंढा येथील निवासस्थानी सांत्वन केल्यानंतर परिसरात माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर संवाद साधला. खासदार गांधी यांनी सांगितले की, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्याचा शवविच्छेदन अहवाल, व्हिडिओ, छायाचित्रे बघितली. त्यावरून संविधानाचे रक्षण करणाऱ्या सोमनाथचा मृत्यू हा संपूर्णत: न्यायालयीन मृत्यू आहे, असे खासदार गांधी म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा भारतीय संविधानाच्या विरोधातील आहे. पोलिसांनी बेदम मारहाण करून सोमनाथची हत्या केल्याचा आरोपही त्यांनी केला. यात जे जे दोषी आहेत त्या सर्वांना शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळ अधिवेशनात दिलेली माहिती पूर्णतः खोटी आहे. या प्रकरणात आम्ही पूर्णपणे चौकशीची मागणी करणार असून निश्चितच यातून सत्य बाहेर येईल व सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळेल, असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला.
या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चिन्नीथल्ला, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते विजय वडेवट्टीवार, बाळासाहेब थोरात, खासदार वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, खासदार संजय जाधव, काँग्रेसचे नेते तथा जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी आमदार सुरेश देशमुख, काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबिरे, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, बाळासाहेब देशमुख आदींसह नेते उपस्थित होते.