संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या

संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या

परभणीत सर्वपक्षीय प्रचंड मोर्चाद्वारे एकमुखी मागणी

 …तर मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही : मनोज जरांगे पाटील 

संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या

परभणी : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणार्‍या आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी एकमुखी मागणी करत शनिवारी (४ जानेवारी) परभणीत सर्वपक्षीय प्रचंड मोर्चा काढण्यात आला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मस्साजोग येथील सरपंच कै.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ विविध मागण्यांकरीता सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सर्वजातीय व सकल मराठा समाजासह विविध सामाजिक संघटना, संस्थांतर्फे नूतन महाविद्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरापर्यंत मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा समारोप जाहीर सभेने झाला.

या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, त्याचबरोबर मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील, खासदार संजय जाधव, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आ.संदीप क्षीरसागर, आ.डॉ.राहुल पाटील, आ.राजेश विटेकर, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, श्रीमती ज्योती मेटे, माजी आमदार सुरेश वरपूडकर, तुकाराम रेंगे, माजी महापौर प्रताप देशमुख, माजी आ. सुरेश देशमुख, माजी आ.अ‍ॅड.विजय गव्हाणे, व्यंकटराव शिंदे, प्रविण देशमुख, भगवानराव वाघमारे, डॉ. विवेक नावंदर, डॉ. विद्या चौधरी, रविराज देशमुख, सुरेश भुमरे, नदीम इनामदार, बाळासाहेब देशमुख, डॉ. केदार खटींग, सुभाष जावळे, गणपत भिसे, अजय गव्हाणे, श्रीधरराव देशमुख, अमोल देशमुख, विनोद कदम, सुनील देशमुख, सचिन देशमुख, किशोर रणेर यांच्यासह सर्वपक्षीय, सर्वधर्मीय व सामाजिक क्षेत्रातील नेतेमंडळी व पदाधिकार्‍यांसह प्रचंड जनसुमदाय सहभागी झाला होता.

या वेळी विविध वक्त्यांनी आपल्या भाषणांमधून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर काही कुटुंबियांनी सुरु केलेल्या दादागिरीवर कडाडून हल्ला चढवला. या जिल्ह्यात एवढी दादागिरी वाढली आहे की, सर्वसामान्य नागरीकांनासुध्दा या दादागिरीच्या धास्तीने, भितीने या जिल्ह्यातून पलायन करत आहेत. त्यांचे अनेक उदाहरणे आहेत, असे म्हटले. या दादागिरीमागे निश्‍चितच मोठी राजकीय ताकद आहे. या ताकदीच्या आशिर्वादानेच वाळू माफिया, राख माफिया, भूखंड माफियांनी संपूर्ण जिल्ह्यात मोठा हैदोस घातला आहे. अन्याय, अत्याचाराच्या दैनंदिन घडामोडींनी अक्षरशः कळस गाठला आहे, असे नमूद करीत या नेतेमंडळींनी पापाचा घडा आता भरला आहे, त्यामुळेच या मंडळींचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याकरीता या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. सरकारने हे प्रकरण हलक्यात घेवू नये, अन्यथा ही वादळापूर्वीची शांतता असेल, असा इशाराही दिला.

राज्य मंत्री मंडळातील मंत्र्यांनीसुध्दा कोण्या गुन्हेगाराला पाठीशी घालू नये, असेही नेतेमंडळींनी नमूद करीत या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामा द्यावा, अशीही मागणी केली. परभणी येथील स्व. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटूंबियांना तसेच लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटूंबियांनाही न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आमदार सुरेश धस यांनी, या प्रकरणात सीआयडीमार्फत चौकशी सुरु आहे, परंतु दोषींवर मोक्कांतर्गत गुन्हे दाखल केले पाहिजेत, या गुन्हेगारांचा तपास सीआयडीने केला पाहिजे, जो कोणी दोषी असेल, त्यास फासावर लटकविले पाहिजे, तसेच या प्रकरणामागील मास्टरमाइंडचासुध्दा शोध लावला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या प्रसंगी खासदार संजय जाधव यांनी, स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आता न्याय हवा आहे. सरकारने दखल घेतली पाहिजे, ही वादळापूर्वीची शांतता आहे, परळी क्रौर्य आणि अन्यायाचं केंद्र बनले आहे, कोणतेही नियम, कायदे तिथले काही लोक मानत नाहीत. पैशाच्या हव्यासापोटी माणुसकी सोडली गेली आहे, त्यामुळे या मंडळींना मोकाट सोडून चालणार नाही, असे ते म्हणाले. आमदार राजेश विटेकर यांनी माणुसकीला काळीमा फासणार्‍या मस्साजोग येथील घटनेचा निषेध व्यक्त केला. आमदार डॉ. राहुल पाटील यांनी स्व. देशमुख यांचा आत्मा टाहो फोडून न्याय मागतोय. या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला. प्रास्ताविक सुभाष जावळे यांनी केले.

 

 …तर मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही : मनोज जरांगे

 

परभणी : संतोष देशमुख यांचे सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडतात? असा सवाल करत परवा पोलीस ठाण्यामध्ये संतोषचे बंधू धनजंय देशमुख यांना धमकी देण्यात आली. हा प्रकार गंभीर असून यापुढे देशमुख कुटुंबाला त्रास दिला तर धनंजय मुुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी दिला. पकडलेल्या आरोपींची नार्को टेस्ट करून त्यांपा सांभाळणार्‍यांना अटक केली पाहिजे. जो आमदार आपल्यासोबत आहे त्याच्या पाठीशी मराठा समाजाने रहावे. सर्व आरोपी पकडले जातील आणि त्यांना कठोर शिक्षा होईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबाला दिलेला असल्याचे सांगून सर्व आरोपींना पकडून त्यांना मदत करणार्‍यांना सहआरोपी करा अशी मागणी श्री.जरांगे यांनी केली.मोक्का व खंडणीतील आरोपी एकचअसून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि यातील एकही आरोपी निर्दोष सुटता कामा नये अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत सर्वांनी पक्ष, संघटना बाजूला सारून त्यांच्या पाठीशी रहावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

 

(छायाचित्रे सौजन्य: उत्तम बोरसुरीकर)

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!