मराठी रोजगाराची भाषा व्हावी

माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत

परभणी : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासनाने इच्छाशक्ती जपली पाहिजे. प्रत्येकाला ज्ञान-विज्ञान आणि तंत्रज्ञान मराठीतच जाणून घेण्याची ओढ पाहिजे. मराठी भाषा ही ज्ञान आणि रोजगाराची भाषा झाल्यास प्रगती होईल,’ असे मत मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली.
येथील बी.रघुनाथ महाविद्यालयाच्या सभागृहात साहित्यिक-सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्ते देविदासराव कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनानिमित्त नुकतेच व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी देशमुख बोलत होते. ‘मराठी भाषा : स्थिती, गती आणि प्रगती’ यावर देशमुख यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी परभणी मराठवाडा साहित्य परिषदेच्या अध्यक्ष सरोज देशपांडे होत्या. कवी इंद्रजित भालेराव, सुनंदा कुलकर्णी, आसाराम लोमटे, अरुण चव्हाळ आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, ‘प्रमाणभाषा सुबोध करून व्यवहार भाषेत बोलीभाषेच्या शब्दांचा समावेश करावा. मराठी भाषा सर्वार्थाने समृद्ध करावी. देविदास कुलकर्णी यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनेकविध उपक्रमांचे आयोजन केले. त्यातून परभणीचे सांस्कृतिक आणि साहित्यविश्व समृद्ध झाले. साहित्यिक उपक्रम उभे करून हा वारसा जपण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे.’ ‘आगामी काळात देविदासराव कुलकर्णी यांच्या नावाने साहित्य पुरस्कार व मराठी भाषा व साहित्य या अनुषंगाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात येईल,’ असे मोहन कुलकर्णी यांनी नमूद केले. साहित्य क्षेत्रात महिलांना मोलाचे स्थान देण्याचे महत्त्वाचे काम देविदास कुलकर्णी यांनी केल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!