महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा ‌!

महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा ‌!

अर्धवट कामांमुळे अपघात वाढले, सेलूतील नागरिकांतून तीव्र संताप

परभणी : सेलू शहरातून गेलेल्या डिग्रसपाटी ते पाथरी रेल्वेगेट पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे (५४८-ब) काम अत्यंत निृकृष्ट दर्जाचे आणि अर्धवट करण्यात आले आहे, असा आरोप सेलूतील नागिरकांतून केला जात आहे. सहा महिन्यांतच जागोजागी उखडत चालेला रस्ता, वसाहतीकडे जाणाऱ्या जोडरस्त्याचा आणि देखभाल दुरूस्तीचा अभाव, नियमबाह्य दुभाजक आणि गतीरोधक व अवरोधकचा पत्ता नसल्याने अपघातात नाहक बळी गेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या अपघातांमुळे सेलूतील महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे दिसून येत आहे.

सेलू शहरातील रायगड कॉर्नर ते पाथरी रेल्वेगेटपर्यंत अनेक ठिकाणी नियमबाह्य पध्दतीने दुभाजक केले आहेत. साडेपाच किलोमीटरमध्ये रस्त्यावर एकाही ठिकाणी गतीरोधक व अवरोधकाचा पत्ता नाही. यामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यात अनेकांना नाहक जीव गमवावा लागला आहे. याबद्दल संबंधित कंत्राटदार, रस्ते महामार्ग विभाग, सेलूतील सार्वजिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविषयी नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अर्धवट कामे जीवघेणी

सरस्वती कंपनीने साडे पाच किलोमीटर लांबीच्या या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे काम केले आहे. थातुरमातुर पद्धतीने नाली बांधकाम झाले. बर्‍याच ठिकाणी नालीवरील धापे पडले आहेत. रस्त्यावरील व लगत साचलेली माती काढून टाकणे, शहरातील वसाहतीकडील जोड रस्ता आदी कामे सहा महिन्यांत झाली नाहीत. काही राजकीय व सामाजिक संस्थांनी मागणी केल्यानंतर पथदिवे, झाडे अलिकडेच लावण्यात आले, तर काही अनावश्यक ओपनिंग दुभाजकाने बंद करण्यात आल्या. परंतु काही ठिकाणी ही कामेसुद्धा अर्धवट आहेत.

चौकाचौकात गतिरोधक झाले नाहीत. जोड रस्ता नसल्याने अशा ठिकाणी खड्डे व अनावश्यक चढ-उतार झाला आहे. यामुळेही अपघातात वाढ झाली आहे. शिवाय शहरातील महामार्ग समपातळीत करण्यात आला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी वळण रस्त्यावर रस्ता एका बाजूला झुकला आहे. उतार मोठा झाल्यानेही अपघात घडत आहेत. वाहनाचा वेग कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर रबरी ब्रेकर किंवा रंगाचे पट्टे मारण्यात आले नाहीत. जून २०२४ पर्यंत कामाची मुदत होती. परंतु सात महिने उलटले तरी अद्यापही काम पूर्णत्वास गेले नाही.

देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष

साडेपाच किलोमीटर लांबीच्या या महामार्गाच्या कामाचा दर्जा अंत्यत निकृष्ट झाला आहे. काही ठिकाणी काम झाले की, महिनाभरातच खड्डे पडले. आता तर बऱ्याच ठिकाणी रस्त्यातील गिट्टी बाहेर दिसत आहे. रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची तरतूद कामामध्ये असते. परंतु संंबंधित अभियंता व कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत. देखभाल दुरुस्तीची कामे होईपर्यंत संबंधित कंपनीचे देयके अदा करू नयेत, अशी मागणी होत आहे.

पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे

संबंधित विभागाचे अभियंता व कंत्राटदार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही अर्धवट कामे पूर्ण केली जात नाहीत. मनमानीपणामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम गुणवत्तापूर्ण झाले नाही. रस्त्याच्या कामात अनेक तांत्रिक दोष आढळून आले आहेत. दर्जाहीन रस्त्यावरून चालणे, चौकातून रस्ता ओलांडून जाणे जिकीरीचे झाले आहे. महामार्गावरील संभाव्य अपघात टाळण्यासाठी अर्धवट कामे पूर्ण व्हावीत, याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!