जीवनप्रवासातील आठवणींना अक्षररूप द्यावे : प्राचार्य द.रा.कुलकर्णी
ग्रंथपाल अरविंद जोशी यांच्या ‘स्मरणरंजन’ पुस्तकाचे सेलूत प्रकाशन
सेलू/परभणी : समाजाच्या कोणत्याही क्षेत्रात कार्य करीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या कार्यकर्तृत्वाबद्दल, कौटुंबिक तसेच सामाजिक जडणघडणीचा जीवन प्रवास, आठवणी वेळ काढून लिहिल्या पाहिजेत. हा संस्मरणीय ठेवा स्वतःला आत्मपरीक्षणसोबतच भावी वाटचालीसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरक ठरत असतो. त्यामुळे प्रत्येकाने लिहिते राहावे आणि आठवणींना अक्षररूप द्यावे, असे मत नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी चिटणीस प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
सेलू येथील नूतन महाविद्यालयाचे माजी ग्रंथपाल अरविंद जोशी लिखित ‘स्मरणरंजन’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी २२ जानेवारी रोजी प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे आणि मान्यवरांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी प्राचार्य कुलकर्णी बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.एस.एम.लोया होते. माजी ग्रंथपाल अरविंद जोशी, डॉ.प्रभाकर देव, डी.के.देशपांडे, प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, सुनिता जोशी गौतम सूर्यवंशी, प्राचार्य डॉ.उत्तम राठोड आदींची उपस्थिती होती. अरविंद जोशी यांनी पुस्तकाच्या लेखनामागील भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन प्रा.सुभाष बिराजदार यांनी केले.