माणसं जोडण्यासाठी लिहा : प्रभाकर साळेगावकर

माणसं जोडण्यासाठी लिहा : प्रभाकर साळेगावकर

नूतन महाविद्यालयाच्या मराठी वाङमय मंडळाचे उद्घाटन

सेलू : ललित साहित्य हे माणसं जोडणारं असलं पाहिजे. आज माणसा- माणसांमध्ये दरी निर्माण होत आहे.त्यामुळे मानवता हे मूल्य जोपासणारं,माणसं जोडणारं साहित्य नव्या पिढीने लिहावं असे प्रतिपादन कवी प्रभाकर साळेगावकर यांनी केले. ते नूतन महाविद्यालयात मराठी वाड्.मय मंडळाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. महेंद्र शिंदे हे होते.यावेळी व्यासपीठावर मराठी विभाग प्रमुख डॉ.राजाराम झोडगे, प्रा. अनंत मोगल,प्रा.हेमचंद्र हडसनकर आणि वाड्.मय मंडळाचे विद्यार्थी सदस्य उपस्थित होते.

आपल्या मनोगतात श्री साळेगावकर पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाबरोबरच लेखन,भाषण यांतून व्यक्त व्हायला शिकले पाहिजे. त्यासाठी वाड्.मय मंडळ हे एक उत्तम व्यासपीठ ठरते. आजच्या तरुणांना दिशाहीन म्हणण्यापेक्षा त्यांना योग्य मार्ग दाखवून त्यांच्या ऊर्जेचा सकारात्मक उपयोग करून घेण्यासाठी विविध अभ्यास मंडळे, उपक्रम राबवले पाहिजेत. यावेळी साळेगावकर यांच्या विविध प्रकारांतील बहारदार कवितांनी उपस्थित विद्यार्थी,श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य डाॅ.महेंद्र शिंदे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.राजाराम झोडगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.हनुमान व्हरगुळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.अनंत मोगल यांनी केले.

महाविद्यालयाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले. 25 जानेवारी रोजी डाॅ. मुंजाभाऊ कव्हळे यांचे ‘भाषिक कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर आभासी पद्धतीने व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.उत्तम राठोड यांनी भूषवले. दरम्यान विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान, गटचर्चा, काव्यवाचन आदी उपक्रम घेण्यात आले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!