योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची मुंबईत आढावा बैठक
मुंबई, दि.५ : राज्यातील कोणत्याही नागरिकाला पिण्याच्या पाण्याचा आणि स्वच्छतेचा अभाव भासू नये. त्यासाठी सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले आहेत. राज्यातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कार्यप्रणालीचा आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली ५ फेब्रुवारीरोजी एचएसबीएस, फोर्ट, मुंबई येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी विभागातील विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीला प्रधान सचिव संजीव खंदारे, संचालक ई.रवींद्रन, सहसचिव बी.जी.पवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अजय सिंग तसेच मुख्य अभियंता व विशेष कार्यकारी अधिकारी प्रशांत भांबरे यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. लवकरच सर्व योजनांची गती वाढवण्यावर भर दिला जावा, ग्रामीण व शहरी भागातील पाणीपुरवठा आणि स्वच्छता व्यवस्थापन अधिक चांगले करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावरही भर देण्यात यावा, असे राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.
ग्रामस्तरावरील पाणीपुरवठा योजनांचे नियोजन व अंमलबजावणी, ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचा आढावा तसेच पाणी पुरवठा योजनेची प्रगती आणि उर्वरित गावांमध्ये जलवाहिन्या पोहोचवण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. राज्यातील स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) ठिकाणी स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी नवीन धोरणांवर विचारविनिमय करण्यात आला. याबरोबरच सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीसाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. पावसाळ्यात अधिक पाणी साठवण करण्यासाठी जलसंधारण प्रकल्पांचे नियोजन करण्यात यावे. गावागावांत रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रणाली लागू करण्यात यावी, पाणी टंचाईग्रस्त भागांसाठी तातडीच्या उपाययोजना ज्या भागांमध्ये उन्हाळ्यात पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न उद्भवतो, अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा, नवीन विहिरी खोदणे, जलस्त्रोत वाढवणे यासारख्या उपाययोजना हाती घेण्यात यावेत, अशा सूचनाही राज्यमंत्री बोर्डीकर यांनी यावेळी दिल्या.