शांतता व सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : ॲड. धर्मपाल मेश्राम
परभणी, 7 : समाजात शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केले.
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची झालेली अवमानाची घटना व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ॲड. मेश्राम यांनी आज विविध सामाजिक संघटनेचे नेते आणि शांतता समितीच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांच्यासमवेत संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती भोजने उपस्थित होत्या.
प्रारंभी उपस्थित नेते व सदस्यांनी सदर घटनेबाबत आपली मते मांडली. सर्वांचे म्हणने ऐकल्यानंतर ॲड. मेश्राम म्हणाले की, परभणीत घडलेली घटना ही दुर्देवी होती. या घटनेच्या अनुषंगाने शासन संवेदनशील असून मी स्वत: घटना घडल्यानंतर तात्काळ परभणी येथे आलो. घटनेच्या पारदर्शक चौकशीसाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. दोषींवर योग्य ती कार्यवाई निश्चितपणे होईल. दरम्यान, समाजात शांतता कायम ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत. तरुणांनी शिक्षणाची कास धरावी. समाजात आज विस्तारीत जाणारी सामाजिक दरी कमी करण्यासाठी सर्वांनीच सामाजिक सलोखा आणि शांततेकरीता पुढाकार घ्यावा.