सेलू तालुक्यातील २२८५ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा
सेलू/परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा सेलू (जि.परभणी ) तालु्यातील २० केंद्रांवर रविवारी, ९ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडली आहे. एकूण २२८५ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. पेपर १ (प्रथम भाषा व गणित) सकाळी ११:०० ते दुपारी १२:३०, तर पेपर २ (तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी) दुपारी २:०० ते ३:३० या वेळेत झाला.
सेलू तालुक्यात गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवीसाठी १४, तर आठवीसाठी ६ अशा एकूण २० केंद्रांवर परीक्षा झाली. पाचवीच्या परीक्षेला प्रविष्ट १४९१ पैकी १४३५ विद्यार्थी उपस्थित होते. तर आठवीचे ८६९पैकी ८५० विद्यार्थी उपस्थित होते, अशी माहिती सेलू तालुका शिष्यवृत्ती विभागप्रमुख मनोज देगावकर, रमेश मरेवार यांनी दिली.
सेलू शहरातील ज्ञानतीर्थ विद्यालय, स्वामी विवेकानंद शाळा, नूतन कन्या प्रशाला, नूतन विद्यालय, तर जिप प्रशाला देऊळगाव गात, वालूर येथील परीक्षा केंद्रावर इयत्ता आठवीची परीक्षा झाली. पाचवीच्या परीक्षेसाठी सेलूतील व्हिजन इंग्लिश स्कूल, नूतन इंग्लिश स्कूल, मॉडर्न इंग्लिश स्कूल, श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय, यशवंत विद्यालय, न्यू हायस्कूल तसेच शांताबाई नखाते शाळा, वालूर, देवगाव फाटा, ज्ञानोपासक विद्यालय कुपटा, जिपप्राशा मोरेगाव, चिकलठाणा, केंप्राशा, वालूर, गुगळी धामणगाव, डासाळा या केंद्रावर पाचवीची परीक्षा आयोजित करण्यात आली. पाचवी व आठवीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण ९,४४,४३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये इयत्ता पाचवीसाठी ५,६६,३५३ विद्यार्थी आणि इयत्ता आठवीसाठी ३,७८,०८१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील ६,४४९ केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली.
दरम्यान, २०२४ मध्ये इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल २०.७६ टक्के होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रश्नांची काठिण्य पातळी थोडी कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निकालात निश्चितच वाढ होईल. मात्र, गुणवत्तायादीसाठी आवश्यक गुणांचा कट ऑफ वाढू शकतो, अशी प्रतिक्रिया नूतन विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षा विभागप्रमुख सुनील तोडकर यांनी दिली. यावेळी केंद्रसंचालक मोहन कोत्तावार उपस्थित होते.