शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करावे
सेलूचे तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांचे आवाहन
सेलू/परभणी : नैसर्गिक आपत्ती अनुदान मिळविण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. सेलू (जि.परभणी) तालुक्यातील शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांनी केले आहे. माहे सप्टेंबर, ऑक्टोंबर २०२२, नाव्हेंबर,डिसेंबर २०२३, सप्टेंबर २०२४ मध्ये अतिवृष्टी, पूर, वादळी वारे, अवेळी पाऊस आदींबाबत नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपाबाबत तलाठी यांच्या मार्फत प्राप्त बाधीत शेतकरी यांच्या याद्या ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड केल्यानंतर प्रस्तुत बाधीत शेतकरी यांचे प्राप्त व्हीके (विशिष्ट क्रंमाक) नंबरच्या याद्या तलाठयांनी गावात वेळोवळी प्रसिध्द केल्या आहेत. त्यानुसार ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत सूचना दिलेली आहे. पंरतु अद्यापही काही शेतकर्यांनी संबधित तलाठी यांच्याकडून व्हीके (विशिष्ट क्रंमाक) नंबर घेऊन ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी सात दिवसाच्या आत आपल्या नजीकच्या महा ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी. अन्यथा नैसर्गिक आपत्ती अनुदान शासनास परत करावे लागेल, असे तहसीलदार डॉ. मगर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.