
पानकन्हेरगांव येथील घटना, सुटकेसाठी नीलगाईची दोन तास झूंज
शिवशंकर निरगुडे | हिंगोली
हिंगोली : विहिरीत पडलेल्या दोन नीलगाईंना सुखरूप बाहेर काढत, शेतकऱ्यांनी जिवदान दिले आहे. सेनगांव तालुक्यातील पानकन्हेरगांव येथे रविवारी (२९ मे) दोन तास सुटकेचा हा थरार बघायला मिळाला. अशोक गुंजकर यांच्या शेतातील विहिरीत दोन नीलगाई पडल्याचे आढळून आले. माहिती मिळताच गुंजकर यांनी विहिरीकडे धाव घेतली. एका तरूणाने तात्काळ दोरखंडाच्या साह्याने विहिरीत उतरून नीलगाईला बाहेर काढले. या साहसी कामगिरीबद्दल शेतकऱ्यांचे कौतुक होत आहे.
सध्या पारा 40 अंश सेल्सियसवर असल्याने माणसांबरोबरच प्राणीमात्रांवरदेखील उष्णतेचा विपरीत परिणाम होत आहे. बऱ्याच भागांमधील पाणी पूर्णतः आटले आहे. डोंगराळ भाग व जंगलामध्ये पाण्याचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळे प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्ती व विहिरीकडे धाव घेत आहेत.
रविवारी (29 मे) गुंजकर डोंगराळ भागातील शेतात गेले असता त्यांना विहिरीत नीलगाई पडल्याचे आढळून आले. त्यांनी वनविभाग अधिकारी शिंदे यांना संपर्क केला. मात्र, शिंदे यांनी बाहेरगावी असल्याचे सांगून कर्मचारी पाठवतो , असे सांगितले.
परंतु वेळ कमी असल्याने विहिरीत पडलेल्या नीलगाई पाण्यात तडफडत होत्या. स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने गुंजकर यांनी दोन्ही नीलगाईंना सुखरूप बाहेर काढून जिवदान दिले. दरम्यान, याभागात पानवठे उभारण्याची मागणी शेतकरी व प्राणी प्रेमी यांच्याकडून केली जात आहे.