गणपतआप्पा मिटकरी यांचा “वीरशैव समाजभूषण गौरव” पुरस्काराने सन्मान

गणपतआप्पा मिटकरी यांचा “वीरशैव समाजभूषण गौरव” पुरस्काराने सन्मान

त्याग, समर्पण, दातृत्वाची नोंद समाज घेत असतो : सद्गुरू काशिनाथ महाराज पाथ्रीकर

सेलू : येथील श्री शंकरलिंग मंदीर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्री निमित्त आयोजित शिवनाम सप्ताहाची सांगता रविवारी, २३ फेब्रुवारी रोजी उत्साहात झाली. याप्रसंगी जेष्ठ वीरशैव बांधव तथा जेष्ठ पत्रकार गणपतआप्पा मिटकरी यांना “वीरशैव समाजभूषण गौरव” पुरस्काराने सद्गुरू काशिनाथ महाराज पाथ्रीकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी मिटकरी कुटुंबिय उपस्थित होते.

अध्यक्षस्थानी मंदिर कमिटीचे अध्यक्ष अशोक वाडकर होते. या वेळी आशीर्वचनपर मार्गदर्शन करताना सद्गुरू काशिनाथ महाराज पाथ्रीकर म्हणाले की, जगद्गुरु जगत्तज्योती महात्मा बसवेश्वर यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आचरण आणि पथक्रमण करणे म्हणजे आपले जीवन सार्थकी लागले आहे. आपण समाजात वावरताना आपले संस्कार, आचार-विचार फार महत्त्वाचे असतात. समाजातील घटकांना गृहीत धरून काम करण्यासाठी धडपड आणि पराकाष्ठा करावी लागते. कोणतेही काम सहजासहजी करणे शक्य नसून ते सर्वांगाने परिपूर्ण असले की, समाज मान्यता मिळते. कठीण प्रसंगातून जाताना बौद्धिक क्षमतेची कसोटी लागते. ती क्षमता ज्यांच्या ठायी असते तेच काम पुर्णत्वास जाते. असे सांगून गणपतआप्पा मिटकरी यांनी जे जे काम समाज उपयोगी केले. त्याच कामाचे फलित म्हणजे हा आजचा सन्मान होय. त्यासाठी झिजावे लागते. त्याग, समर्पण भाव, दातृत्वाची जाण ठेवून काम करणाऱ्या व्यक्तीची नोंद समाज घेत असतो, असे प्रतिपादन सद्गुरू काशिनाथ महाराज पाथ्रीकर यांनी केले.

अध्यक्षीय समारोप करताना अशोक वाडकर म्हणाले की, समाजाच्या हिताकरीता खूप खूप कामे करता येतात. वीरशैव समाजातील व्यक्तींनी मतभिन्नता विसरून चांगल्या कामासाठी एकत्रित आले पाहिजे. दूरदृष्टी, समाजहित, मंदिर उत्पन्नाच स्त्रोत वाढीसाठी पुढे आले तर निश्चितच स्पृहणीय आहे. आपण आज आहोत उद्या कोणीही असणार आहे. परंतु चांगले काम करत राहिल्यास समाजातील व्यक्तींनी सहकार्याची भूमिका निभावली जावी, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

या संपूर्ण सप्ताहात आध्यात्मिक संस्कारक्षम कार्यक्रमाचे पौरिहित्य मंदिर देवस्थानचे पुजारी कैलास स्वामी थळपती व कैलास स्वामी मिटकर यांनी केले. सप्ताहात विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रुद्र अभिषेक, प्रासादिक कीर्तन, शिवलिला अमृत पारायण, सायंकाळी संगीत शिवकथा वेदमूर्ती विरभद्र स्वामी पिंपळगावकर यांनी सांगितली. त्यांना साथसंगत लिंबराज पाटील, योगेश स्वामी यांनी दिली. यावेळी सप्ताहात अन्नदान आणि अन्य कामांसाठी योगदान देणाऱ्या सद्भक्तांचा संस्थानाचे अध्यक्ष यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन मिटकरी, सूत्रसंचालन संस्थानाचे सचिव प्रा.मिलिंद झमकडे, आभार ॲड. शाम राऊत यांनी मानले. तर गौरव प्रमाणपत्राचं वाचन पवन स्वामी कामटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.शंकरलिंग मंदिर देवस्थानचे सदस्य बालासाहेब सरकाळे, विश्वनाथ हुगे, शुभम सोळंके, शुभम महाजन, गणेशआप्पा केशरखाणे, प्रकाश साखरे, शुभम नवघरे, किरण भगत, बाळासाहेब वीर, महेश शेटे, सागर महाजन, संजय झमकडे, राजेंद्रआप्पा नावाडे , दत्तात्रय मिटकर, अशोकआप्पा मसुरे, सुनील नवघरे , महेश मिटकर, सचिन चौरे , दत्तात्रय चौरे, नागनाथ हमाणे, सोमनाथ सोळंके, सुशिल नाईकवाडे, बस्वराज शिवणकर, हरिभाऊ काळे आदींसह वीरशैव बांधवांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!