भाजपकडून देश विभाजनाचा प्रयत्न : कॉम्रेड प्रकाश कारत
सेलूतील ‘माकप’च्या जाहीर सभेत कारत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
परभणी : स्वत:च्या स्वार्थासाठी हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण करून भारतीय जनता पक्ष राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. देशात तिसऱ्यांदा सत्तेत आलेले मोदी सरकार हे आरएसएसचा हिंदू सांप्रदायिक अजेंडा राबबित आहे. ज्याव्दारे हिंदुत्वाच्या नावाआडून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा हल्लाबोल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे केंद्रीय समन्वयक कॉम्रेड प्रकाश कारत यांनी केला आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या २४ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशनास गुरूवारपासून (२७ फेब्रुवारी) सेलू (जि.परभणी) येथील साई नाट्यगृहात सुरूवात झाली आहे. सांयकाळी लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ जाहीर सभा झाली. त्या वेळी कॉम्रेड कारत बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉम्रेड दत्तुसिंग ठाकूर होते. पॉलिट ब्युरो सदस्य माजी खासदार कॉम्रेड निलोत्पल बसु, कॉम्रेड डॉ.अशोक ढवळे, राज्य सचिव कॉम्रेड डॉ.उदय नारकर, माजी आमदार नरसय्या आडम, जे.पी.गावित, मरियम ढवळे, आमदार कॉम्रेड विनोद निकोले, डी.एम.कराड, यू.आर.थोंबाळ, डॉ.अजित नवले आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या वेळी विविध मान्यवरांनी विचार मांडले. प्रास्ताविक कॉम्रेड रामकृष्ण शेरे, सूत्रसंचालन कॉम्रेड रामेश्वर पौळ, तर दीपक लिपणे यांनी आभार मानले.
कॉम्रेड कारत यांनी आपल्या भाषणात केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकरच्या जनताविरोधी ध्येयधोरणांवर कडाडून टिका केली. कारत म्हणाले, की केंद्रात मोदी यांच्या नेतृत्वात तसेच महाराष्ट्रातही फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार आहे. डबल इंजिन सरकारमुळे आता राज्यातील कामगार, शेतकरी, कष्टकरी जनतेचे डबल शोषण होणार आहे. कारत म्हणाले की, मागील दहा वर्षापासून मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे देशातील अंबानी, अदानी, टाटा, बिरला यांसारख्या मोजक्या बड्या भाडवंलदारांचा फायदा होत आहे. विविध सवलतीतून उर्जा निर्मिती, पायाभूत उद्योग क्षेत्रामध्ये मुठभर भांडवलदारांनाच कामे दिली जात आहेत.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दयनीय स्थिती
नवउदारमतवादी धोरणामुळे महाराष्ट्रातील शेती संकटात सापडली आहे. वर्षाला दोन ते तीन हजार शेतकरी आत्महत्या होत आहेत. अशा दयनीय स्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी आहे. शेतकऱ्यांना भत्ता नाही, तर शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. कोट्यवधी बेरोजगार तरूण, महिलांनाच्या हाताला काम हवे आहे, असे सांगून मोदी आणि भाजपशासीत राज्य सरकारे ही लोकशाही व्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी संविधानिक संस्थांवर हल्ले करीत आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना हरप्रकारे त्रास दिला जात आहे, असा आरोप कारत यांनी केला.
जनतेच्या अधिकारासाठीचा संघर्ष सुरूच राहणार
सांप्रदायिकतेच्या विरोधात लोकशाहीच्या रक्षणासाठीचा, कष्टकरी जनता, शेतकरी, शेतमजुर, लाखो असंघटित मजूर, कामगार महिला, दलित, आदिवासी आदी सर्व घटकांच्या हितासाठी, जनतेच्या न्याय अधिकार आणि मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा दृढतापूर्वक संघर्ष आगामी काळातही सुरूच राहणार आहे, असा विश्वास कॉम्रेड प्रकाश कारत यांनी यावेळी दिला आहे.
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) : जाहीर सभा, सेलू जि.परभणी लिंक – सौजन्य – जनशक्ती