योजनांच्या लाभासाठी अडवणूक झाल्यास तक्रार करा
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे नागरिकांना आवाहन
परभणी : घरकुल, विहिरी किंवा वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी एक रूपयादेखील देण्याची गरज नसून अशाप्रकारे कुणी पैशांची मागणी करून लाभार्थ्यांची अडवणूक करत असेल तर तक्रार घेऊन माझ्याकडे या, असे आवाहन राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शनिवारी (१ मार्च) पत्रकार परिषदेतून केले आहे. याप्रसंगी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, महानगर अध्यक्ष राजेश देशमुख, सुरेश भुमरे, बाळासाहेब जाधव, विलास बाबर, प्रभाकर वाघीकर, सुनील देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी पालकमंत्री बोर्डीकर यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा २०२५-२६ वर्षासाठीचा महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प सादर केला आहे. एकूण ५० लाख कोटी रुपयांच्या बजेटमध्ये मध्यमवर्ग, शेतकरी, युवा, वंचित घटक, गरीब कल्याण आणि महिलांचा समावेश करून समाजाच्या सर्व स्तरांचा विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे राज्यमंंत्री बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत दृष्टिकोनाला गती देणारा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे, असे नमूद करून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही परभणी जिल्ह्याला भरपूर तरतूद केली जाईल, अशी अपेक्षा पालकमंत्री बोर्डीकर यांनी व्यक्त केली.