विभागीय कृषी महोत्सवाला परभणीमध्ये सुरुवात
श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास केंद्राचे आयोजन, भरगच्च कार्यक्रम
परभणी : श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) च्या वतीने परभणीतील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडिअम मैदानावर आयोजित चार दिवसीय मराठवाडा विभागीय कृषी महोत्सव २०२५ चे उद्घाटन शुक्रवारी (७ मार्च) थाटात पार पडले. कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांच्याहस्ते उद्घाटन झाले. या वेळी खासदार संजय जाधव, गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे, गुरुपुत्र कृषिरत्न आबासाहेब मोरे, आयुक्त धैर्यशील जाधव, आत्मा परभणीचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, तसेच सेवा मार्गाचे विभागीय प्रतिनिधी संदीपभाऊ देशमुख, डॉ.गोविंद साळुंके, सचिन गोरे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, शेती आणि आध्यात्मिक विश्वास एकत्रितपणे समाजविकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. अध्यात्माच्या जोडीने विकासाचे कार्य करण्याची महाराष्ट्र आणि मराठवाड्याची संस्कृती आहे. ही बाब प्रसंशनीय आहे. या कार्यक्रमाचे आयोजक हे धार्मिक गुरु असून ते राष्ट्र विकास, कृषी विकास यातून समाजाचा विकास सतत साधत आहेत, ही गोष्ट कौतुकास्पद आहे. खासदार जाधव यांनी आपल्या भाषणातून मराठवाडा दुष्काळी भाग आहे. शेतीचे उत्पादन अल्प प्रमाणात आहे. परंतु, शेतकर्यांनी दिंडोरी प्रणित कृषि शास्त्र विभागाच्या माध्यमातून जर शेती केली तर ती नक्कीच फायद्याची ठरेल, असे नमूद केले.
नितीनभाऊ मोरे म्हणाले की, आजमितीस आपण खात असलेल्या अन्नधान्यात विषारी अंश जास्त असल्यामुळे अनेक दुर्धर आजार उद्भवत आहेत, त्यासाठी जर विषमुक्त शेतीच्या माध्यमातून अन्नधान्य पिकवले तर नक्कीच अशा आजारांना आळा बसेल. १० मार्चपर्यंत चालणाऱ्या या कृषी महोत्सवात विभागीय कृषी प्रदर्शन, पूरक व्यवसाय प्रदर्शन, युवा प्रबोधन, कृषी दिंडी विज्ञान प्रदर्शन, मराठवाडा कृषी संस्कृती दर्शन, स्वयंचलित यंत्रसामग्री प्रदर्शन, बियाणे व पशुपालन मेळावा, मोफत आरोग्य तपासणी शिबिर यांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रकारचे १५० हून अधिक स्टॉल असून प्रदर्शनामुळे स्टेडिअम परिसरात चैतन्य फुलले आहे. यामध्ये मराठवाड्यातील हजारो शेतकरी, कृषी संस्था, संशोधक, विद्यार्थी आणि कृषी उद्योजकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे.
कृषी दिंडीने वेधले लक्ष
महोत्सवानिमित्त शनिवार बाजारातून सकाळी नऊ वाजता कृषी दिंडी काढण्यात आली. या दिंडीत ध्वजधारी, कलशधारी महिला, भजनी मंडळे, लेझीम पथके, बंजारा झाकी, विविध देवतांच्या वेशभूषा असलेले सजीव देखावे, विविध पारंपाररिक नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शेती संस्कृती असलेली बैलगाडी व वेशभूषा साकारलेले सेवेकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले होते.