विकासकामांत दुजाभाव; मागासवर्गीयवस्त्यांकडे दुर्लक्ष
पँथर संघर्ष ग्रुपचा आरोप, सेलू पालिकेसमोर धरणे आंदोलन
सेलू : सेलू शहरात विकासकामे करताना दुजाभाव केला जात आहे. केवळ उचभ्रू वसाहतीमध्ये विकासकामे करण्यात येत आहे. मागासवर्गीय वस्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप पँथर संघर्ष ग्रुपच्या वतीने करण्यात आला असून मागासवर्गीयवस्त्यांमध्येही विकासकामे करण्यात यावे या मागणीसाठी सेलू नगरपालिकेसमोर शुक्रवारी, ७ मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.
सेलू शहरात मागील काही महिन्यांपासून विविध विकास कामे करण्यात येत आहेत. मात्र सदरिल विकास कामे केवळ उचभ्रू वसाहतीमध्ये करण्यात येत आहेत. तसेच विकासकामे केवळ काही निवड वसाहतीमध्ये केली जात असून शहरातील मागासवर्गीय वस्त्यामध्येही मूलभूत सुविधांची कामे करण्यात यावीत. अनेक मागासवस्त्यामध्ये रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था कामे प्रलंबित आहेत. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
मागासवस्त्यामध्ये तात्काळ मूलभूत सूविधांची कामे करावीत अशी मागणी करण्यात आली आहे. धरणे आंदोलनात पँथर संघर्ष ग्रुपच्यावतीने रोहन आकात, विनोद धापसे, विकास धापसे, रोहित गायकवाड, सागर गायकवाड, स्वप्निल साळवे, धनंजय जाधव, कपिल धापसे, ऋतिक सावंत आदींनी सहभाग घेतला.