मुलींनो, मानसिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हा
प्राचार्य डॉ.कमलताई गवई यांचे प्रतिपादन; जागतिक महिला दिनानिमित्त वनामकृवित विशेष कार्यक्रम
परभणी : कोणत्याही देशाची प्रगती महिलांच्या प्रगतीवर ओळखली जाते असे, त्यामुळे महिलांनी विशेषतः मुलींनी आर्थिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हावे, असे प्रतिपादन माजी लेडी गव्हर्नर व अमरावती येथील तक्षशीला महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.कमलताई गवई यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने गुरूवारी, ६ मार्च रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.इंद्र मणि होते. आयएएस मिशनचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ.खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ.राकेश आहिरे, कुलसचिव संतोष वेणीकर यांची विशेष उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ.गवई यांनी विपश्यना ही जीवन जगण्याची कला असल्यामुळे विपश्यना आणि वृक्षारोपण करत लोककल्याणासाठी चांगले कार्य करण्यावर भर दिल्याचे नमूद करून शेती करणे हे कठीण आहे, परंतु या कृषि विद्यापीठात मुली बहुसंख्येने शिक्षण घेत आहेत याचे कौतुक वाटते, असे त्या म्हणाल्या. घर, शेती, स्वतःचे शिक्षण, समाजसेवा सांभाळत तारेवरची कसरत करत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांची आई म्हणून यशस्वी पालन केल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी युवकांमध्ये क्षमता असून सध्याच्या स्थितीत त्यांना जागे करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीपासूनच आयएएसचा अभ्यास करण्यास प्रवृत्त केले असून रोजचे काम रोजच करा आणि प्रत्येक कार्य स्वतःच्या वेगळ्या पद्धतीने करा, असा प्रेरणादायी संदेश देवून प्रोत्साहित केले. शिक्षण संचालक डॉ.आसेवार, कुलसचिव संतोष वेणीकर यांनी मनोगत मांडले. प्रास्ताविक डॉ. गोदावरी पवार यांनी केले. सहयोगी अधिष्ठाता डॉ.जया बंगाळे आणि डॉ.गजेंद्र लोंढे यांनी आयोजनासाठी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन सारिका नारळे यांनी केले, तर डॉ.फरिया खान यांनी पाहुण्यांचा परिचय देऊन व आभार मानले. कार्यक्रमास विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिलांचा सन्मान कृतीतून सिद्ध व्हावा : कोणालाही छोटे करून स्वतः मोठे होता येत नाही, तर आपले कार्य मोठे ठेवावे लागते. मानवी जीवनामध्ये महिलांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान होतो, तेथे सुख, शांती आणि समृद्धी नांदते. म्हणून महिलांचा सन्मान प्रत्येकाने करावा आणि हे आपल्या कृतीतून सिद्ध व्हावे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.इन्द्र मणि यांनी अध्यक्षीय भाषणात केले.