महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे आवश्यक
लेखिका शुभदा गोळेगावकर यांचे मत, महिला दिनानिमित्त श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात कार्यक्रम
सेलू : जागतिक महिला दिनानिमित्त येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात शनिवारी, ८ मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना लेखिका शुभदा गोळेगावकर म्हणाल्या की, महिलांना संविधानाने खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिले असून महिलांचे सक्षमीकरण होणे आणखी गरजेचे आहे. स्त्रियांमुळे समाज खऱ्या अर्थाने सशक्त होतो. त्यामुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे आवश्यक आहेत.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी.यु. हळणे तर प्रमुख पाहुण्या म्हणून लेखिका तथा कवयित्री शुभदा गोळेगावकर, जेष्ठ शिक्षक दिलीप बेदरकर, अलका धर्माधिकारी, किशोर खारकर, कीर्ती कुलकर्णी, सुचिता पितळे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक शुभांगी भाग्यवंत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय जयश्रीआडे-सोन्नेकर यांनी दिला.
यावेळी अलका धर्माधिकारी, कीर्ती कुलकर्णी, सुचिता पितळे यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शुभदा गोळेगावकर म्हणाल्या की, महिलांना संविधानाने खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिले. समाजात स्त्रियांना अधिकार हे राज्यघटनेने मिळाले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरात भारतीय राज्यघटना ठेवणे व त्याचे वारंवार वाचन करणे गरजेचे आहे. महिलांचे सक्षमीकरण होणे आणखी गरजेचे आहे. स्त्रियांमुळे समाज खऱ्या अर्थाने सशक्त होतो. महिलांवर होणारे अत्याचार कमी करण्यासाठी कठोर कायदे, उपाययोजना करणेही आवश्यक आहे. ” तू जिजाऊ ,तू सावित्री ” ही कविता सादर करून विविध प्रसंग सांगून महिलांबाबत व मुलींना कसे जगावे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सर्व शाळेच्या वतीने भेटवस्तू देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन रुपाली कुरुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन धनश्री शिंदे यांनी केले.