संतसाहित्य जीवनाला अर्थ प्राप्त करून देते
पद्मश्री डॉ.मोहन आगाशे यांचे प्रतिपादन; डॉ.जगदीश नाईक यांच्या ‘तुकायन’ चे पुस्तकाचे प्रकाशन
परभणी : जीवन जगण्यासाठी आवश्यक असे तत्त्वज्ञान वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या रुपात आणि भाषांमध्ये लोकांसमोर आलेले आहे. ते लोकांना सहज समजेल अशा पद्धतीने मांडणे आवश्यक असते आणि संतसाहित्य जीवनला अर्थ प्राप्त करून देते. माणसाने फक्त त्याच्याशी स्वतःला जोडून घेणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी तथा सिनेअभिनेते पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांनी केले.
रविवारी, ९ मार्चरोजी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात संपन्न झालेल्या डॉ.जगदीश नाईक यांच्या ‘तुकायन’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कवी प्रा.इंद्रजीत भालेराव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. विकास बाहेकर, डॉ. रामेश्वर नाईक, डॉ. जगदीश नाईक यांची उपस्थिती होती.
डॉ.आगाशे पुढे बोलताना म्हणाले की, आधुनिक ज्ञान विज्ञानशास्त्र शिकणार्या लोकांनी यापूर्वी आपल्या संस्कृतीत काय सांगितले आहे त्याचा नीटपणे व्यवस्थित अभ्यास करावा. आजही रामायण महाभारत वंशपरंपरागत आपल्या कायम स्मृतीत आहे. डॉ. जगदीश नाईक यांना आरईबीटी त्यांच्या आईने अभंग गाथ्यातून शिकवली. पुढे वैद्यकीय शिक्षण घेताना ती त्यांना शास्त्रातून नंतर शिकायला मिळाली. ‘तुकायन’ हा मानसशास्त्रीय विचारसरणीवरील ग्रंथ लिहून डॉ.जगदिश मानसशास्त्राचा विद्यार्थी असल्याचा हेतू सफल झाला. गीता ही श्रीकृष्णाने नैराश्यात असलेल्यांना दिलेली देणगी आहे. मी स्वतः लेखक नाही. मला लिहिणार्यांचा हेवा वाटतो. मला जे काही सांगायचे आहे ते मी चित्रपटाच्या माध्यमातून सांगतो, जे न सांगता लोकांना सहजपणे कळते. ‘तुकायन’ सारख्या ग्रंथांमधून आजही तुकाराम कायम जिवंत आहे. ज्येष्ठ, अशिक्षित लोकांमध्ये सुशिक्षित म्हणावे असे सुसंस्कृत लोक जास्त प्रमाणात आहेत. त्यांच्याशी आपल्याला संवाद साधावा लागेल. त्यांना अधिक समजून घ्यावे लागेल. ‘दिठी’ हा चित्रपट तुम्हा परभणीकरांना अधिक समजेल असे मला वाटते. कारण तुम्ही परभणीकर संतसाहित्याच्या अधिक जवळ आहात, असेही ते म्हणाले.
आपल्या अभिनयातून आणि मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून चित्रपट क्षेत्राला मोठे योगदान दिल्यामुळे डॉ. मोहन आगाशे कायम अजरामर असणार आहेत. युगप्रवर्तक चित्रपटांची परंपरा निर्माण करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे सद्गती, दोघी,दिठी असे अनेक चित्रपट महत्त्वपूर्ण आहेत. संत तुकारामांच्या गाथेमधून सामाजिक, कृषी, वाड्मयीन, भाषाशास्त्रीय, काव्य, ऐतिहासिक, कथन, नाट्य, रंग, सुलेखन, उद्योजक, व्यापारी, स्त्री दलित विषयक अशा विविध जाणीवा आढळून येत असल्याने या जाणिवा असणारे अनेक लोक स्वतःला गाथ्याशी जोडून घेतात. गाथेचे मंथन करणार्या प्रत्येकाच्या हाती नवनीत मिळते. तर गाथेच्या महासागरात डुबकी मारणारा सराईत खूप मोठे माणिक मोती हाती घेऊन वर येतो असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.भालेराव यांनी व्यक्त केले.
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. विकास बाहेकर यांनीही संतपरंपरेचा गौरव करत या ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्ताने डॉ.नाईक यांना शुभेच्छा दिल्या. सर्व मान्यवरांच्या हस्ते ‘तुकायन’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.भगवान काळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय अरविंद सगर यांनी करून दिला. आभार प्रदर्शन बाळू बुधवंत यांनी केले. या प्रकाशन सोहळ्याला परभणी शहरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.