मानापमान, रुसव्या-फुगव्यांना फाटा द्या : गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या विभागीय कृषि महोत्सवाचा समारोप
परभणी : जीवनात प्रगतीच्या दिशेने झेप घेण्यासाठी प्रत्येकाने मानापमान, रुसवे-फुगवे याला फाटा दिला पाहिजे. ‘मी’पणा टाळला पाहिजे. नकारात्मक उर्जेपासून स्वतःला कोसोदूर ठेवून सकारात्मक ऊर्जा साठविण्यासाठी अध्यात्माशी जोडून घेतले पाहिजे, असे मत प.पु. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सोमवारी, १० मार्च रोजी परभणीत आयोजित केलेल्या ‘अमृततूल्य हितगुज’ कार्यक्रमातून व्यक्त केले.
श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) च्या वतीने ७ मार्चपासून परभणीतील प्रियदर्शनी इंदिरा गांधी मैदानावर आयोजित चार दिवसीय मराठवाडा विभागीय कृषी महोत्सवचा समारोप सोमवारी झाला. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विविध विषयांवर भाष्य केले. विशेषतः संस्कृती संवर्धनाबाबत परखड मते व्यक्त केली. आज घराघरांमधून भक्त पुंडलीक, श्रावणबाळ तयार झाले पाहिजेत. मुलं हीच देशाची संपत्ती आहेत, त्यामुळे मुलांना संस्कारात वाढविणे, संस्कारातून जपणे हेच महत्वपूर्ण काम आहे. त्यामुळे प्रत्येकाने संस्कारक्षम पिढी घडविण्याच्या दृष्टीने सर्वार्थाने जबाबदारीने प्रयत्न केले पाहिजेत. मूल्यशिक्षण ही सुध्दा आज काळाची गरज ठरली आहे. गर्भसंस्कार, शिशू संस्कार यामुळे आपली संस्कृती अबाधित राहणार आहे. गेल्या ३५-४० वर्षांपासून दिंडोरी प्रणित अध्यात्मिक केंद्रातून विविध विभागाच्या माध्यमातून हेच काम निरंतर सुरु आहे, असे ते म्हणाले. माणूस नावाची एकच जात, एकच संस्कृती आहे, असे स्पष्ट करतेवेळी गुरुमाऊली मोरे यांनी जात, पात, धर्म सोडून केलेले काम हे मनोबल उंचावणारे आहे. प्रगतीकडे नेणारे आहे, असे ते म्हणाले.
निरोगी पिढी तयार व्हावी
आज देशात अनेक असाध्य असे आजार उद्भवले आहेत, हे निदर्शनास आणून गुरुमाऊली मोरे यांनी या पार्श्वभूमीवर आज प्रत्येकापर्यंत उत्तम आरोग्य पोहोचलेच पाहिजे, निरोगी अशी पिढी तयार झाली पाहिजे. प्रत्येकाने स्वतःच्या, कुटूंबियांच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, उत्तम आरोग्यासाठी दुध, साखर, साबूदाना, मीठ आणि मैदा या पाच पांढर्या वस्तू या प्रकर्षाने टाळल्या पाहिजेत. शुध्द शेती, सेंद्रीय शेती ही काळाची नितांत गरज ठरली आहे. आहारावर योग्य नियंत्रण राखावे. प्रत्येकाचे जीवन, आरोग्य निरोगी रहावे यासाठी मातीशी नाळ जूळवून ठेवावी, हाच कृषि महोत्सवाचाही उद्देश आहे, असे ते म्हणाले. विज्ञान व आध्यात्म यांची सांगड घातली पाहिजे. डोकं टेकल्याबरोबर ज्याला शांत झोप येते तो खरा भाग्यवंत, असे नमूद केले. यावेळी मान्यवरांसह मोठ्या संख्येने सेवेकरी उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Photo Credit – Uttam Borsurikar, Parbhani