आक्रोश : रस्त्यासाठी हळदवाडी ग्रामस्थांचा भरपावसात टाहो

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात रस्त्याची आस, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

शिवशंकर निरगुडे, हिंगोली

हिंगोली : जिल्ह्यातील नरसी नामदेव येथून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेले हळदवाडी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्येही रस्त्यासाठी झगडत आहे. येथील ग्रामस्थांनी बुधवारपासून (एक जून) रस्त्यासाठी भरपावसात उपोषण सुरू केले आहे.
जेमतेम ५० उंबरठ्याचे आणि सुमारे चारशे लोकवस्तीची हळदवाडी. गावात कुणबी, आदिवासी, बौद्ध, वारली आदी समाजवस्ती. परंतु, गेल्या पंचाहत्तर वर्षात गावात जाण्यासाठी रस्ता नाही. पावसाळ्यात पावसाचे पाणी, हिवाळा आणि उन्हाळ्यात शेतकऱ्याच्या शेतातील पाणी रस्त्यावर असते. यामुळे बाराही महिने नागरिकांना जीव मुठीत घेऊन, चिखलाने भरलेले खड्डे तुडवत प्रवास करावा लागतो. आजारी रुग्णांना मुख्य रस्त्यापर्यंत उचलून न्यावे लागत आहे. शाळकरी मुलांना चिखलातून वाट काढत जावे लागते. लग्न समारंभ, अंत्यविधीसाठी आलेल्या पाहुणे मंडळींची रस्त्यावरून मिळणारी हीन वागणूक ग्रामस्थांना सहन करावी लागते. मुला-मुलींच्या लग्नातही रस्ता अडसर ठरत आहे.

शेतमालकाने धरले वेठीला

गावात जाण्यासाठी नागरिक ज्या रस्त्याचा वापर करत आहेत. त्या जागेवर एका शेतकऱ्याचा मालकी हक्क आहे. त्यामुळे शेतमालक गावात जाणारा रस्ताच करून देत नाही. स्थानिक राजकारणामुळे अनेक वर्षांपासून जागा मालकाने पूर्ण गावाला वेठीस धरले आहे. असा ग्रामस्थांचा आरोप आहे. लोकप्रतिनिधींनीही शेतमालकासोबत कैकदा बैठका घेऊन प्रयत्न केले आहेत. अटी शर्यतीही मान्य केल्या आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी जागा मालकाने रस्ता देण्यासाठी अनेक वेळ होकार सुद्धा दिलेला. परंतु शब्द पाळला नाही. अमंलबजावणी शून्य आहे.

लोकन्यायालयीन संघर्ष करणार

या संदर्भात गावातील नागरिक, तरुण वर्गाने एकत्र येऊन ही लढाई लढण्यासाठी आता आम्ही लोकन्यायालयात जाऊन लढणार असल्याचे सांगितले आहे. दोन दिवसापासून गावातील महिला पुरुष लहान बालके हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे. या आंदोलनाला यश येणार का …? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
जिल्ह्यातील खेड्या-पाड्यात अतिदुर्गम भागात सुद्धा चकचकीत रस्ते झालेत. मात्र, राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या हळदवाडी गावात जाण्यासाठी स्वातंत्र्य काळापासून रस्ताच नाही, हे चित्र संतापजनक आहे, अशी भावना व्यक्त करीत रस्ता तातडीने करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!