विद्यार्थ्यांनी घेतली पाणी बचतीची शपथ
सेलूतील विवेकानंद विद्यालयात जलदिन साजरा
सेलू : शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद विद्यालयात जागतिक जलदिन (२२मार्च) साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी पाणी बचतीची शपथ घेतली.
पाण्याचा अयोग्य, अविचारी व अतिवापर होत असल्याने पाण्याची समस्या जगाला भेडसावत आहे. पाणी हे जीवन आहे, असे असले तरी पाण्याचे संकट जाणवत आहे. भविष्यात पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी विवेकानंद विद्यालयात जलदिन साजरा करण्यात आला. शिक्षक विजय चौधरी यांनी विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञेद्वारे पाण्याचे महत्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी पाणी बचतीचे संदेश फलक तयार केले. ‘जल है तो कल है’ अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.