सेलूतील विवेकानंद बालसंस्कार केंद्राचे वासंतिक शिबीर उत्साहात
योग, प्राणायाम, विविध प्रेरणादायी स्तोत्रे, संस्कार कथा आदी उपक्रम
सेलू : येथील विवेकानंद नगरातील विवेकानंद बालवाडी केंद्रात बालसंस्कार शिबीर उत्साहात पार पडले. १९ ते २२ मार्च २०२५ या चार दिवसाच्या कालावधीत चाललेल्या या शिबीरात सकाळी ८ ते १० या वेळेत योग, प्राणायाम, विविध प्रेरणादायी स्तोत्रे, साने गुरूजींच्या संस्कार कथा, सामाजिक, राष्ट्रीय व सांस्कृतिक विचारांचे विज्ञानाधिष्ठीत उद्बोधन कार्यक्रम झाले.
सानेगुरूजींच्या स्वावलंबन, साहस श्रमप्रतिष्ठा आदि कला गुणांचे धडे देणाऱ्या कथांच्या आधारे वृक्षारोपण, संवर्धन व जपणूक आदींचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. मोहिनी लोणीकर, रेणुका बोठे, सीमा आष्टीकर, वृषाली देशमुख यांनी बालकांना मार्गदर्शन केले.
साने गुरूजी कथामालेच्या हेलस ता.मंठा जि.जालना शाखेच्या अध्यक्ष कल्पनाताई हेलसकर व ज्येष्ठ कवी गौतम सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. अध्यक्षस्थानी सुधीर चौधरी होते. व्यासपीठावर किरण डुघ्रेकर व मकरंद दिग्रसकर आणि लीलाताई देशपांडे यांचीही उपस्थिती होती. कल्पनाताई हेलसकर यांनी उपस्थित बालकांना मनोरंजक बडबड गीतात सहभागी करत साने गुरूजींच्या कथेतून संस्कारात पालकांची भूमिका व महत्त्व विशद केले. आजच्या काळात आपल्या मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले. गौतम सूर्यवंशी यांनी “आई आमची शाळा ” या कवितेतून बालक व पालकांचे संस्कारक्षम नाते विशद केले. या प्रसंगी उपस्थित पालकांपैकी प्राप्ती रोडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. किरण डुघ्रेकर यांचे यावेळी शिक्षण व संस्काराचे महत्त्व विशद करणारे समयोचित भाषण झाले. प्रारंभी दीपप्रज्वलन आणि ” खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ” प्रार्थना झाली. अध्यक्षीय समारोप सुधीरराव चौधरी यांनी केला. सूत्रसंचालन मोहिनी लोणीकर यांनी केले तर देशमुख यानी उपस्थितांचे आभार मानले. सामुहिक पसायदानाने शिबीराची सांगता झाली. शिबीर यशस्वी करण्यासाठी बालवाडी ताई यांच्यासह सेविका संजीवनीताई रामपूरकर व जनसेवा पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.