जैन धर्मीय परंपरेच्या थाटात कन्येचा विवाह
उद्योजक बिनायके परिवाराचे आयोजन, सूर्यास्तापूर्वी भोजन; परंपरेचे काटेकोर पालन
सेलू जि.परभणी : पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करत असताना विवाह समारंभात धर्मीयपरंपरांना छेद देत विवाह उरकण्याची पद्धत रूढ होत चालली आहे. मात्र, अशाही परिस्थितीत जैन धर्मीय परंपरेचे काटेकोर पालन करत अगदी कंदमूळ, आलू, कांदे, लसूण हे भोजनातील आवश्यक पदार्थ टाळून सर्वच वऱ्हाडी मंडळींच्या भोजनाची व्यवस्था सूर्यास्तापूर्वीच करण्यात आली.
सेलू येथील उद्योजक निलेश बिनायके यांची कन्या मेघा आणि राजकोट येथील उद्योजक निलेश वारिया यांचा मुलगा शाश्वत यांचा शुभविवाह सोमवारी २४ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जिमखाना क्लब येथे जैन धर्मीय परंपरेच्या थाटात पार पडला.
पारंपारिक जैन पद्धतीने सर्व विधी करण्यात आले. अगदी विवाह समारंभाची सुरुवात म्हणजेच रेल्वे स्थानकावर आलेले ९४ बराती यांचे स्वागत वधुपक्षा कडील १०७ भाऊबंदांनी केले. पारंपारिक राजस्थानी घूमर नृत्य सादर करून बरातींचे स्वागत करण्यात आले. लग्न सोहळा दुपारी बारा वाजता प्रारंभ झाला. जबलपूर येथील विद्वान शास्त्री विरागजी यांनी शास्त्रोक्त पद्धतीने विवाहाचे महत्त्व विशद केले. सप्तपदी करण्याचे कारण सांगून त्यावेळी जी प्रतिज्ञा घेतली जाते त्याचे महत्त्व पटवून दिले .उपस्थित सर्व पाहुणे मंडळींनी पारंपारिक पद्धतीने संपन्न होत असलेला हा अनोखा विवाह समारंभ आम्ही प्रथमच अनुभवत असल्याचे मत व्यक्त केले. पाश्चात्य संस्कृतीला छेद देत जैन संस्कृती जीवित ठेवण्याचा हा सोहळा अनोखा असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली.
सेलू येथील गायिका पूजा तोडकर यांनी मंगलाष्टक सादर केले. विवाह समारंभानंतर आहेर देण्याच्या विधीमध्ये वर पिता यांना स्त्री शृंगार धारण करून गंमतीदार वातावरण तयार करण्यात आले होते. रात्रीच्या संगीत कार्यक्रमात दोन्ही कुटुंबीयांच्या वतीने नृत्य सादर करण्यात आले. संपूर्ण शुभविवाह समारंभात कर्कश्य आवाजाच्या वाद्याला छेद देण्यात आला होता; तसेच पशुवरील भारारोपण टाळण्यासाठी घोड्याचा वापर देखील टाळण्यात आला होता. विवाह समारंभातील वैशिष्ट्य म्हणजे वधू पक्ष व वर पक्षाकडील मंडळींनी एकमेकांना केशरी रंग लावून आम्ही आता एक रंग झालो, असे दाखवून दिले. वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, शेतकरी संघटनेचे नेते गोविंद जोशी, प्राचार्य डी.आर. कुलकर्णी, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, उद्योजक जयप्रकाश बिहाणी, विजय बिहाणी, रवींद्र वैद्य, अभय हंचनाळ, विलास पहाडे, यांच्यासह राजकोट, मुंबई ,येथील उद्योजक, तसेच राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तराखंड, झारखंड, तेलंगणा आदी राज्यातून देखील मान्यवर पाहुणी मंडळींची उपस्थिती होती.