हातनूरच्या श्री नागनाथ मंदिरातील सूर्यकिरणोत्सवांचा अद्भुत सोहळा
– प्रा.डॉ.सीमा नानवटे (डोल्हारे), मूर्तीकला अभ्यासक, परभणी
दक्षिणायन असो, की उत्तरायण श्री नागनाथ भगवंताच्या भेटीला श्रीक्षेत्र हातनूर (ता.सेलू जि.परभणी) येथील शिवालयात रोजच सूर्यनारायण येतात. ही सूर्यकिरणे मार्च महिन्यात अधिक तेजोमय रूपात भगवंत नागनाथाला प्रकाशित करतात. सकाळच्या वेळेसचा श्री नागनाथ मंदिरातील सूर्यकिरणोत्सवाचा अद्भुत असा हा क्षण सोनेरी किरणांनी प्रकाशमान झालेले मूर्तीचे तेजस्वी रूप सर्व भाविकभक्तांना अनुभवता येत आहे.
मंदिर रचना करणाऱ्या स्थापत्यकारांनी गवाक्षांची किंवा जालवातायनाची आणि मुख्य प्रवेशद्वाराची योजना अशीकाही केली आहे, की खेळती हवा आणि प्रकाश शिवालयात सर्वत्र रहावा आणि शिवलिंग सुद्धा सकाळीच प्रकाशाने उजळून निघावे, अनेक वैशिष्ट्यांनी नटलेले स्थापत्य कलाविष्काराचा अद्भुत नमुना असलेले असे हे ठिकाण म्हणजे परभणी जिल्ह्यातील श्री नागनाथ भगवान मंदिर श्रीक्षेत्र हातनूर हे गाव आहे.
परभणी जिल्ह्याच्या वायव्य दिशेला ५० कि.मी.अंतरावर हातनूर हे गाव सेलू तालुक्यात आहे. या गावास समृध्द असा ऐतिहासिक वारसा लाभलेला असून या वैभवशाली वारशाच्या पाउलखूना गावकन्यांनी जतन आणि संवर्धन केलेल्या दिसतात. गावात नागनाथ मंदिर, नागनाथ बारव, उत्तरेश्वर मंदिर, दगडी तेल घाणे इत्यादी पाहण्यासारखे आहेत. श्री नागनाथ शिवालय पूर्वाभिमुख असून भूमिजपद्धतीचे आहे. मंदिराचे विधान मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह व दोन उपगर्भगृह अशा रचनेचे आहे.
सभामंडपाचे वितान भितीतील बारा स्तंभावर तोललेले आहे. अतिशय अद्भुत व आकर्षक रचना या वितानाची दिसते
तुळ्यांचे कोपऱ्यावर चार झुंबर आहेत. त्यावर उलटे नाग आहेत. चार तुळयांचे मध्यभागी प्राण्यांचे खुर भासावेत अशी कोरीव रचना आहे. वितानाच्या मध्यभागी चौरस रचना असून त्यात पद्म आहे. अतीशय सुंदर अशी वितान रचना असून विशेष उल्लेखनीय आहे.
गावामध्ये पूर्वापार चालत आलेली एक विशेष परंपरा गावकऱ्यांनी जपलेली आहे. जीणर्णोद्धार करणे हे परमपुण्याचे काम मानले जाते. आपल्या वैभवशाली वारशाला जतन आणि संवर्धन करण्याची अर्थात जिर्णोद्धार करण्याची परंपरा आजतागायत कायम आहे. उत्तर चालुक्य काळात निर्माण झालेले येथील शिवालय यादव काळामध्ये जीर्णोद्धार केल्याचे दिसते. जीर्णोद्धार केल्याचा संदर्भ येथील शिलालेखात आहे, हा यादव कालखंड होय तत्कालीन कालखंडाचा विचार करताना विशेष उल्लेखनीय म्हणजे ज्यावेळेस दिल्ली येथे राजकीय स्थित्यंतरे झाली त्याचे पडसाद दक्षिण भारतावर उमटू लागले होते, वारसा स्थळे आणि संस्कृती धोक्यात आली होती. हाच तो यादवकाळ होता. अशा कठीण प्रसंगी मोडकळीस आलेल्या मंदिराचा जिर्णोद्धार करून आपला वारसाच नव्हे! तर
संस्कृती रक्षणाची ज्योत आजपर्यंत तेवत ठेवली ती या गावाने. पूर्वजांचा आदर्श हातनूरच्या लोकसमुदायाने पावलोपावली जपला आहे. नागनाथ तीर्थ म्हणजे येथील बारवेचा केलेला जिर्णोद्धार हा एक स्तुत्य उपक्रम आहे. नागनाथ मंदिराच्या पूर्व दिशेला नागनाथ तीर्थ बारव आहे. बारवेत उतरण्यासाठी चारही बाजूला चार प्रवेशद्वार आहेत. अलीकडे गावकऱ्यांनी एक कोटी रुपये खर्चुन मंदिर आणि मंदिरासमोरील नागनाथ तीर्थ (बारव) यांचा स्थापत्य शास्त्रीय दृष्टिकोनातून जिर्णोद्धार केला आहे. महाशिवरात्रीला बारवेत दीपोत्सव मोठ्या उल्हासात साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून उत्पन्नाचा काही भाग
लोककल्याणा करिता दान देण्याची परंपरा होती. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा गावकऱ्यांनी जपली आहे. या गावातील लोक आपल्या उत्पन्नातील काही भाग मंदिरास अर्पण करतात. गावातील प्रत्येक नागरिक हा आपल्या उत्पनाचा एक टका रकम हि कोणी न मागता मंदिर कार्यालयात जमा करतात मग तो मजुर कामगार असला तरी न मागता आणून देतात. परंपरेने चालत आलेला विशेष कौतुकास्पद असा हा उपक्रम आहे. या जमा झालेल्या निधीमधून
स्वबळावर अनेक जनकल्याणाचे कार्य मंदिर संस्थेकडून केले जातात, समाजा समोर ठेवलेला हा मोठा आदर्श आहे. पूर्वपार चालत आलेली सकारात्मक विचारांची स्पंदने आजपर्यंत या परिसरात कार्यरत आहेत, हे तेथे गेल्यावर जाणवते. महाशिवरात्री यात्रा महोत्सव हा तीन दिवस असतो महाशिवरात्री निमित्त गावातील नागरिक पाच दिवसांचे उपवास करतात महिलांचे प्रमाण जास्त आहे, परंतु बरेच पुरुष मंडळीसुद्धा पाच दिवसांचा उपवास करतात. या परिसराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे परिसरात श्री संत सेवालाल महाराज मंदिर आहे. येथे श्री राम नवमीला यात्रा भरते पंचक्रोशीतील बंजारा बांधव मोठ्या संख्येने यात्रेला येतात. असे हे परभणी जिल्ह्यातील श्री क्षेत्र हातनूरचे श्री.नागनाथ संस्थान पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे.
***