श्रीगुरु नथुरामबाबा केहाळकर यांनी वारकरी संप्रदायाला पुढे नेले : इंद्रजित भालेराव
‘प्रेमसिंधू’ जीवनचरित्राचा प्रकाशन सोहळा उत्साहात
जिंतूर : श्रीगुरु नथुरामबाबा महाराज केहाळकर यांनी वारकरी संप्रदायाला समयोचित पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या कठोर साधनेने आणि सखोल अभ्यासाने त्यांना ऋषितुल्य स्थान प्राप्त झाले. त्यांचा लोकसंग्रह अफाट होता आणि त्यांचे धवल चारित्र्य अनुकरणीय आदर्श ठरले आहे, असे मत कवी तथा संत साहित्याचे अभ्यासक प्रा.इंद्रजित भालेराव यांनी केले.
श्रीगुरु नथुरामबाबा महाराज केहाळकर यांच्या जीवनावर आधारित ‘प्रेमसिंधू’ या जीवनचरित्राचा प्रकाशन सोहळा श्री मैनापुरी देवस्थान पुंगळा (ता. जिंतूर) येथे मंगळवारी, २५ मार्चरोजी मोठ्या उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी म्हणून डॉ. तुकाराम महाराज ठाकुरबुवा उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद सावजी कळमकर यांची उपस्थिती होती. कवी भालेराव म्हणाले, “श्रीगुरु हभप नथुराम महाराज यांचे जीवन हे प्रेमाचा महासागर होते. म्हणूनच या चरित्राचे नाव ‘प्रेमसिंधू’ समर्पक आहे. लेखनाचा कोणताही अनुभव नसलेल्या नारायण महाराज पांगरीकर यांनी दोन-तीनशे पानांचे हे जीवनचरित्र लिहिणे हे प्रसादासारखेच आहे. या ग्रंथामुळे श्रीगुरु नथुराम महाराजांच्या पवित्र स्मृती चिरंतन राहतील.”
प्रास्ताविक प्रा.डॉ.संगीता घुगे यांनी केले. सूत्रसंचालन खुशाल मुंढे यांनी केले. युवकमित्र नारायण महाराज पांगरीकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंढरीनाथ देवस्थान संस्थान पांगरी आणि गावकरी मंडळींनी विशेष परिश्रम घेतले.